धोकादायक पद्धतीने सुरू आहे पाण्याच्या टाकीचे काम; ठेकेदाराचा हलगर्जीपणा
तळेगाव : नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असताना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे साधारण 100 फूट उंचीवर जीव धोक्यात घालून कामगार काम करत आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात सुरू असलेल्या नवीन पाण्याच्या टाकीच्या कामात कामगारांचा जीव धोक्यात घालून काम करून घेतले जात आहे.
चौराई जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या येथे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. साधारणपणे 90 ते 100 फूट उंचावर सुरू असलेल्या कामात कामगार आपला जीव धोक्यात घालून कोणत्याही सुरक्षा उपाययोजना विना काम करताना दिसत आहेत.
शहराला उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी या नवीन टाकीचे बांधकाम सुरू आहे. परंतु संबंधित ठेकेदाराने काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा बेल्ट, जॅकेट, हेल्मेट, हातमोजे अशी सुरक्षा उपकरणे का पुरवली नाहीत ? असा प्रश्न उपस्थित होतोय. सदर ठिकाणी दुर्दैवाने अपघात झालेल्या जीवित हानी होऊ शकते तर ही नियमांचे उल्लंघन करून कामगारांकडून काम करून घेतले जात आहे. संबंधित ठेकेदार कामगारांच्या सुरक्षेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय का? असे असल्यास ठेकेदारावर कारवाई होणार का? नगरपरिषद याची दखल घेणार का ?असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
यासंदर्भात मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्याशी संपर्क साधला असता सुरक्षा उपकरणे पुरवण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. नगर परिषदेमार्फत त्याला नोटीस काढण्यात येईल. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे वेळीच दखल घेऊन ठेकेदार कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.