शेतकरी कुटुंबाला घर बांधून देत पार पडणार भोई कुटुंबाचा आगळावेगळा लग्न सोहळा
पुणे : हल्ली विवाह म्हटला की, अनेक समारंभ, मौजमजा त्यासाठी होणारा अवाढव्य खर्च देखावा हे जणू समीकरणच झाले आहे.परंतु याला फाटा देत पुण्यातील डॉ. मिलिंद भोई व त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत एका शेतकरी कुटुंबातील विधवा महिलेला घर बांधून देत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
डॉ. मिलिंद भोई हे सामाजिक क्षेत्रातील एक मोठे नाव आहे. त्यांनी आजपर्यंत देशभर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सामाजिक कार्याची ही परंपरा कायम ठेवत त्यांनी आपल्या मुलीच्या लग्न निमित्ताने नांदेड मधील अर्धापूर येथील लक्ष्मी साखरे या शेतात राबणाऱ्या उन्हातानात काम करणाऱ्या शेतकरी महिलेच्या कुटुंबावर मायेची सावली धरत त्यांना राहण्यासाठी घर बांधून दिले आहे.
नांदेड येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांचे पालकत्व भोई प्रतिष्ठानने मागील ६ वर्षांपासून स्वीकारलेले आहेच. परंतु पुढचे पाऊल टाकत या मुलांना मायेचा आधार देत यातीलच एका जिद्दीने दिवसभर शेतात काम करून सायंकाळी मुलांचा अभ्यास घेता घेता स्वतः अभ्यास करून दहावीचे शिक्षण घेणाऱ्या लक्ष्मी साखरे यांना भोई कुटुंबीयांची लाड लेक गायत्री हिच्या विवाह निमित्ताने घर बांधून दिले आहे.
प्रत्येक कुटुंबाने हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अवास्तव खर्च टाळत विवाह सोहळे पार पाडले तर अनेक गरजूंना यातून मदत मिळू शकते. तरी आपापल्या परीने प्रत्येकाने सामाजिक बांधीलकी जपावी असे आवाहन यानिमित्ताने भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व वधूपिता डॉ. मिलिंद भोई यांनी केले आहे.