तळेगावातील नवीन समर्थ विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
तळेगाव : शहरातील नवीन समर्थ विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे खजीनदार राजेश म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष दीपक बाळसराफ, डॉ. शाळीग्राम भंडारी, नविन समर्थ विद्यालयाचे अध्यक्ष महेशभाई शहा,शाळेचे मुख्याध्यापक कैलास पारधी, माजी मुख्याध्यापिका इरावती केतकर ,माजी विद्यार्थी, दहावीचे विद्यार्थी व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
शाळेची माजी विद्यार्थी दरवर्षी या कार्यक्रमात उत्साहाने व हिरीरीने सहभागी होतात. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांशी माजी मुख्याध्यापिका इरावती केतकर यांनी वर्गात संवाद साधला. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, पूर्वीच्या काळी विद्यार्थी व गुरुजनांमध्ये विश्वासाचे व आपुलकीचे नाते होते. विद्यार्थ्यांच्या घरगूती अडीअडचणी सोडविण्यासाठी सुद्धा अनेक वेळा शिक्षक पूर्वी प्रयत्न करत. विद्यार्थ्यांचा आपल्या शिक्षकांवर दृढविश्वास होता. काळानुरूप या नात्यात बदल झाला आहे. शाळेत विद्यार्थ्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक तयारी होते. शाळेत होणारी निखळ मैत्री ही आयुष्यभराची शिदोरी असते. आयुष्याच्या शाळेत तुम्ही विद्यार्थ्यांनी गाठलेली शिखरे पाहून मला भारावल्यासारखे झाले आहे. माझ्या विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उंचावले याचा मला सार्थ अभिमान आहे.
यावेळी 1987 सालीच्या माजी विद्यार्थ्यांनी माजी मुख्याध्यापिका इरावती केतकर यांना भेटवस्तू देऊन सन्मानित केले. 35 वर्षानंतर झालेल्या या भेटीमुळे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गात बसून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.