शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील महिला देखील सर्वच क्षेत्रात आघाडीवर – रामदास काकडे
जागतिक महिला दिनानिमित्त इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान
तळेगाव दाभाडे : शिक्षणामुळे आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. यामध्ये शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील महिला देखील सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या दिसतात, ही स्वागतार्ह बाब आहे, असे प्रतिपादन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रामदास काकडे बोलत होते. ॲड. निशा चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. दीपक शहा, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, सदस्या निरुपा कानिटकर, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी महाविद्यालयाचे संचालक डॉ .बी. बी.जैन, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. विठ्ठल चोपडे, डी. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जी. एस. शिंदे, कांतीलाल शहा विद्यालयाच्या प्राचार्या पद्मिनी तेजानी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना रामदास काकडे म्हणाले, की शिक्षणामुळे महिला आज घराबाहेर पडलेल्या दिसतात. राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक अशा सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. पूर्वीसारखी फक्त चूल आणि मूल यामध्ये अडकून न राहता ती पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. महिला घराबाहेर पडली तरी तिला कुटुंबाची काळजी घ्यावीच लागते. एकप्रकारे ती कुटुंबाचा प्रमुख असते. म्हणजेच तिच्यामुळेच आज कुटुंबव्यवस्था टिकून आहे. महिला एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असते, हे राजमाता जिजाऊ, मावळकन्या उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक कर्तृत्ववान महिलांच्या उदाहरणांवरून लक्षात येते. आज मी जो काही घडलो आहे, त्यामागे आईची भूमिका खूप मोठी आहे, असे सांगत रामदास काकडे यांनी आपल्या आईच्या संदर्भातील अनेक आठवणी, प्रसंग सांगितले.
ॲड. नीशा चव्हाण म्हणाल्या, की महिला शिक्षित झाल्या, तरी अनेक महिला पुढे येण्याचे धाडस करीत नाहीत. काही क्षेत्रांमध्ये महिला आजही दिसत नाहीत. सर्वोच्च न्यायालयात फक्त तेरा महिला न्यायमूर्ती झाल्या आहेत. याचाच अर्थ वकिली क्षेत्रात महिला पुढे येत नाहीत. स्त्रियांवर अन्याय अत्याचार होताना दिसतो, त्यांना कायद्याचा आधार घेऊन जगावे लागते. आजही स्त्रीमुक्तीवर बोलावे लागते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरुपा कानिटकर यांनी, सूत्रसंचालन व आभार सौजन्या बकरे यांनी मानले.