राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी मधमाशांच्या हल्ल्यात अकरा जण जखमी
लोणावळा : भोसरी येथील आयटी कंपनीत कार्यरत असणारा एक ग्रुप काल रविवार सुट्टीच्या निमित्ताने सकाळी नऊ वाजता मावळ तालुक्यातील कातळदरा येथे पर्यटनासाठी आला होता. यावेळी या ग्रुपमधील अकरा जणांवर मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले . लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
भोसरी व रावेत भागातील काही आयटी कंपनीतील मुले व मुली लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या कातळदरी परिसरात फिरण्यासाठी आले असता दुपारी बारा वाजता रखरखत्या उन्हामुळे एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले.त्यावेळी मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. यातील चार ते पाच जणांना माशांनी मोठ्या प्रमाणावर चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच लोणावळ्यातील शिवदुर्गमित्र व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य त्या ठिकाणी पोहोचले. लागलीच मदत कार्य सुरू करत त्यांनी पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या मदत कार्यात शिवदुर्ग मित्राचे अशोक मते, सुनील गायकवाड,महेश मसने, राजेंद्र कडू, आनंद गावडे, निलेश गराडे, गणेश मिसाळ, शुभम काकडे ,जिगर सोळंकी ,आदित्य पिलाने, आयुष वर्तक, अमोल सुतार आदींचा समावेश होता.