दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेवर !
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांच्या पेपर तपासणीचे कामकाज राज्यात सुरळीत सुरू आहे. पेपर तपासणी ही वेगाने सुरू असल्याने दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल वेळेवर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोना आणि त्याचा एकूणच प्रादुर्भाव ओसरला असल्याने राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेतल्या होत्या. त्याविरोधात काही पालकांनी न्यायालयातही धाव घेतली हेाती; परंतु न्यायालयानेही मंडळाच्या भूमिकेवर निर्णय दिल्याने राज्यात या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आणि सुरळीत पार पडल्या होत्या.दहावीच्या परीक्षेला यंदा १५ मार्चपासून सुरुवात झाली होती. या परीक्षेला राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतून पाच हजार ५० मुख्य आणि १६ हजार ३३५ उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला तब्बल १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थी बसले होते. बारावीची परीक्षा ही ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली होती. त्या परीक्षेला राज्यभरातून १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थी बसले होते.
दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा सुरू होताच राज्यातील शिक्षक आणि संस्थाचालक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.मात्र राज्य शिक्षण मंडळाने नियोजन केल्याने या दोन्ही परीक्षांच्या पेपर तपासणीचे काम सुरूळीत सुरू असून बारावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा जूनच्या अखेरच्या आठवड्यापूर्वीच निकाल जाहीर होण्याची मंडळातील वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.