पिंपरी चिंचवड, तळेगाव वासीयांचे भारतीय रेल्वे कधी ऐकणार ?
साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिहगड एक्स्प्रेस मध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या तुफान हाणामारी ची बातमी..
पिंपरी चिंचवड, तळेगाव वासीयांचे भारतीय रेल्वे कधी ऐकणार ?
आवाज न्यूज : हर्षल आल्पे, वार्ताहर, तळेगाव दाभाडे १५ ऑक्टोबर.
साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या सिहगड एक्स्प्रेस मध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या तुफान हाणामारी ची बातमी सर्वत्र गाजत होती.
खरतर नेहमी या गाडीतून आणि डेक्कन क़्विन गाडीतून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बातमी काही नवीन नाही. असे थोडेबहुत प्रसंग सगळ्यांनीच कधी न कधी पाहिले आहेत.
खरतर वाढत्या लोकसंख्येला ह्या दोन गाड्या आता पुरेनाश्या झाल्या आहेतच, त्यात खरा उच्छाद मांडतात तो म्हणजे दैनंदिन जाणारे काही पासधारक, ज्यांनी आपली एक टोळीच बनवली आहे. जी पुणे स्टेशन ला जवळ जवळ धावती गाडी पकडून पहिले म्हणजे जागा अडवते. आणि मग अख्खा प्रवास इतर कुणा ही नव्या प्रवाशाला जो त्यांच्या ओळखीचा नाही, अशा सर्व लोकाना विशेषत: अध्ये मध्ये चढणाऱ्या लोकांना बसू देत नाही. एक वेळ तो डबा रिकामा जाईल पण , तिथे नवीन आलेल्या लोकांना बसायला देणार नाही. आणि मग होते मारामारी. सगळे एकत्र येऊन एकाला धोपटणे असे प्रकार सुद्धा होतात, तिथे, रेल्वे प्रशासन मात्र हतबलपणे या गोष्टी बघत बसते. त्यात ही टोळी सांगते कि आम्ही रेल्वे ला जागेसाठी पास च्या खर्चावर अतिरिक्त पैसे देतो, त्यामुळे आम्हाला डब्यात प्रवेश देण्याचा न देण्याचा स्वयंघोषित अधिकारच आहे.
मग पिंपरी चिंचवड आणि तळेगावकरांनी काय प्रवास करायचाच नाही का ? तुम्ही आम्हाला केवळ आमच्यासाठीच असलेले डबे ही देणार नाही. तळेगावकरांची तर ८० च्या दशकापासून असलेली सिहगड थांबवण्याची मागणी ही पूर्ण करणार नाही. शिवाय सह्याद्री एक्स्प्रेस सारखी ट्रेन जी एक सक्षम पर्याय होती, ती ही बंद करणार, कोविड चे कारण सांगून, मग आम्ही प्रवास करायचा कसा? पिंपरी चिंचवड हून चढायचे म्हंटले, किंवा लोणावळ्यातून, तर जागा रिकामी असून ही दादागिरी मुळे आम्हाला बसायला मिळणार नाही. आम्ही विरोध केला कि मार खाणार ? मग रेल्वेचीच इच्छा आहे का ? कि आम्ही रेल्वे ने जाउच नये.
आणि मुळात रेल्वे मंत्रालय या अशा प्रकारच्या झुंडगिरीला प्रोत्साहन देतेच का ? चालू ट्रेन मध्ये हाणामारी होऊच कशी शकते ? अनेक ज्या आज टोळ्या निर्माण झाल्या आहेत, ज्यांचे थेट रेल्वे अधिकाऱ्यांशी साटेलोटे आहे, त्यांच्यावर आणि त्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही ?
सिहगड ला किमान पिंपरी चिंचवड साठी आरक्षित डबे हवेतच आणि तळेगाव ला थांबा हवाच, कारण आज तिथे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे, आणि फक्त तळेगावच नव्हे, तर तळेगाव दाभाडे स्टेशन वर संपूर्ण मावळ आणि चाकण पर्यंत चा भाग हा अवलंबून आहे .
किमान या साठी तरी मुख्य ट्रेन थांबवा(सिहगड/ डेक्कन क्वीन /प्रगती ) नाही तर आमच्या हक्काची सह्याद्री एक्स्प्रेस चालू करा आणि त्यात पिंपरी चिंचवड वासीयांसाठी आरक्षित डबे द्या आणि पूर्वी प्रमाणे त्या वेळेत तळेगावला थांबा द्या
इतकेच..