लेखी आश्वासनानंतर तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीचे आंदोलन मागे…
चाकण महामार्ग कृती समितीच्या वतीने तळेगावातील अवजड वाहन प्रवेश बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी अथवा पर्यायी मार्ग म्हणून सर्व अवजड वाहतूक तळेगाव एमआयडीसी मार्गे चाकणकडे वळवावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
लेखी आश्वासनानंतर तळेगाव-चाकण महामार्ग कृती समितीचे आंदोलन मागे
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १४ नोव्हेंबर.
चाकण महामार्ग कृती समितीच्या वतीने तळेगावातील अवजड वाहन प्रवेश बंदीची काटेकोर अंमलबजावणी करावी अथवा पर्यायी मार्ग म्हणून सर्व अवजड वाहतूक तळेगाव एमआयडीसी मार्गे चाकणकडे वळवावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. रविवारी करण्यात आलेले ठिय्या आंदोलन लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. या आंदोलनास जनसेवा विकास समितीसह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता.
यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष नितीन गाडे, उपाध्यक्ष दिलीप डोळस, मिलिंद अच्युत, माजी नगरसेवक अरुण माने, अक्षय लोंढे, प्रमोद दाभाडे, संदीप गोंदेगावे, भुपेंद्र खोल्लम हे उपस्थित होते. अपघाताचे मोठे प्रमाण आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे अवजड वाहने एमआयडीसी मार्गे सोडण्यात यावीत, अतिक्रमण उठवले पाहीजे, रुंदीकरणाची घोषणा होवून ५ वर्षं झाली अद्याप रुंदीकरण झाले नाही, या महामार्गावरील देखभाल कामे करण्यात यावीत या मागण्या आंदोलनात अधोरेखित करण्यात आल्या.
नंतर मराठा क्रांतीचौकात महामार्गावर अर्धातास रस्तारोखून धरण्यात आला.यावेळी घोषणाबाजीही झाली. तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील बाजूने शासकीय जागेत असलेली सर्व अतिक्रमणे येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत काढण्यात येतील. तळेगावच्या हद्दीतील देखभाल दुरुस्ती सुरु असलेले काम आणि चाकण पर्यंत रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने असणारे मार्किंगचे काम येत्या ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने भारतीय राजमार्ग प्राधिकरण विभाग तांत्रिक व्यवस्थापक अनिल गोरड यांनी दिले. त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असे जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी सांगितले. यावेळी निखिल भगत,सुनील पवार, कल्पेश भगत,अनील पवार उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रमोद देशक यांनी केले. अमित प्रभावळकर यांनी आभार मानले. यानंतर शोकसभा घेण्यात येवून नुकतेच अपघाती निधन झालेले आनंद साबळे आणि गेल्या ५ वर्षात या महामार्गावर बळी गेलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.