करत असलेल्या कृतीतून आपले कौशल्य दाखवणे म्हणजे कला होय- सिनेदिग्दर्शक सुनील नाईक
शिवाजी विद्यापीठातील एक दिवशीय कार्यशाळेमध्ये बोलत होते!
कोणत्याही कलेमध्ये आपणास प्राविण्य मिळवायचे असेल तर पहिल्यांदा ती कला आपण आत्मसात करणे खूप गरजेचे असते. कारण आपण करत असलेल्या कृतीतून आपले कौशल्य दाखवणे म्हणजेच आपली निस्सीम कला असते. कारण दिलेल्या कलेला आकार देऊन एक कलाकृती आपल्यासमोर सादर करतो तो खरा सच्चा कलाकार असतो. असे मत काल दिग्दर्शक सुनील नाईक यांनी काढले.
ते काल शिवाजी विद्यापीठातील स्क्रिप्ट टू स्क्रीन या कार्यशाळेमध्ये पीजी डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नलिझम व मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
प्रारंभी विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजीराव जाधव यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांना स्वलिखित डिजिटल इलेक्शन हा ग्रंथ व मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला स्पेक्ट्रम मीडिया या विशेषांकाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला. त्यावेळी श्री जाधव यांनी आपल्या विभागातून चालत असलेल्या कोर्स संदर्भात माहिती दिली तसेच नवीनच चालू होत असलेल्या “B.A.In Film Making” कोर्स संदर्भात विस्तृत माहिती दिली.
डॉ प्रसाद ठाकूर यांनी पाहुण्यांची ओळख करून देताना सांगितले की कार्यशाळेस लाभलेले दिग्दर्शक सुनील नाईक हे गेले 30 वर्षे सिनेसृष्टी मध्ये आपले योगदान देत असून आजपर्यंत त्यांनी थियटर सह सर्व विभागांमध्ये आपला ठसा उमटवला असून आज पर्यंत त्यांनी मुन्नाभाई, फकीरा, ओंजळ, मोहिनी, मोरूची मावशी, अशा वेगवेगळ्या नाटक चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन केले आहे. त्यांचे पडद्यामागची गोष्ट हे पुस्तक आजच्या तरुण पिढीसाठी मैलाचा दगड ठरला आहे.
पुढे आपल्या कार्यशाळेमध्ये संबोधित करताना सुनील नाईक म्हणाले , स्वप्न पाहणे चुकीचे नाही पण ती स्वप्ने सत्यात पेरणे महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण ज्या मातीत वाढला आहात ती मातीच मुळी चित्रपट सृष्टीची पंढरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे अभिनय आपल्या रक्तातच असला पाहिजे. सिनेसृष्टीमध्ये रोजगाराच्या संधी मुबलक उपलब्ध असून एकूण 30 विभागांमध्ये आपल्याला संधी उपलब्ध असून देखील यामध्ये सर्वात दुर्लक्षित असणाऱ्या पण अतिशय आव्हानात्मक असणाऱ्या एक्टिंग क्षेत्राकडे सर्वजण फोकस करतात, पण त्याचबरोबर निर्मिती, लेखन, दिग्दर्शन, कॅमेरा साऊंड, संकलन या विभागात विपुल संधी उपलब्ध असून त्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा कारण पाणी पिऊन कोणाला पैलवान होता येत नाही आपल्या सवयी बदला आपले आयुष्य बदलेल, कोणतीही गोष्ट रसाळ पद्धतीने कथन करणे म्हणजे आपल्यामध्ये एक दिग्दर्शक दडलेला असतो एवढे नक्की. मन, काया, वाणी, नियंत्रित ठेवल्यास आपणास स्वतःला प्रस्तुत देखील चांगल्या प्रकारे करता येते.
या कार्यशाळेमध्ये त्यांनी अनेक उपस्थित विद्यार्थ्यांच्या कडून अनेक प्रकारचे सोपे ॲक्ट करून घेतले. एक यशस्वी निर्माता होण्यासाठी भाव, विभाव व अनुभव किती महत्त्वाचा असतो हे त्यांनी प्रत्यक्ष व्यासपीठावर आपल्या अभिनय कौशल्यातून दाखवले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या अनेक प्रश्नांची लीलया उत्तरे देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे आभार सुमेधा साळुंखे यांनी मानले.
———————————————————————–