देवचंदच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला 1942 च्या क्रांती लढ्याचा इतिहास!
इतिहास व समाजशास्त्र विभागाकडून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.!
author title=”किरण पाटील ” image=”http://nipaninagari.com”]
आपल्या परिसरातील ज्या स्वातंत्र्यवीरांनी गारगोटी येथील खजिना हस्तगत करण्यासाठी जो लढा दिला त्या हुतात्म्यांची शौर्यगाथा अंगावर रोमांच उभी करणारी आहे. 13 डिसेंबर 1942 च्या ऐतिहासिक घटनेत ज्या सात क्रांतिकारकांनी आत्मबलिदान केले त्या घटनेस 81 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी देवचंद कॉलेजच्या इ. 12 वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी 1942 च्या क्रांती लढ्यातील साक्षीदार असणाऱ्या कापशीतील स्वामी चौक, मुरगुड मधील वाघ्या बुवाचा मठ, गारगोटीतील इंजूबाई चे मंदिर, कचेरीचे ठिकाण,कुरचा पुल, पालीची वनराई आणि क्रांतीचा कट ज्या पालीच्या गुहेमध्ये शिजला त्या गुहेत भेट देऊन अभ्यास दौरा केला. इतिहास व समाजशास्त्र विभागाकडून या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.
13 डिसेंबर 1942 रोजी गारगोटी येथील खजिना हस्तगत करताना सात वीरानी हौतात्म्य पत्करले. या संपूर्ण लढ्याचा इतिहास प्रा. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यां समोर कथन केला. हा धगधगत्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास ऐकताना विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आज घडीला कापशी येथील करवीरय्या स्वामी चौकातून या अभ्यास दौऱ्याची सुरुवात केली. तेथून संपर्काची माध्यमे नसताना ज्या पालीच्या गुहेत संपूर्ण लढ्याचे नियोजन केले ती सर्व ठिकाणे विद्यार्थ्यांना दाखवली. विद्यार्थ्यांनी या वेळी ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या अजरामर झालेल्या या लढ्याचा रोमांचकारी अनुभव घेता आला.
प्रा. सागर परीट व प्रा. प्रकाश पाटील, यांनी पालीच्या वनराईतील वनस्पतींची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या ठिकाणाला भेट दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. व खरीखुरी अभ्यास सहल ठरल्याचे सांगितले.
इ.12 वी कला शाखेतील 35 विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला.या अभ्यास दौऱ्यासाठी प्राचार्या प्रो. डॉ. जी डी इंगळे, उपप्राचार्य प्रा. ए . डी. पवार, पर्यवेक्षिका एस पी जाधव यांचे सहकार्य लाभले.