मताचा जोगवा मागणाऱ्या सर्व राजकारण्यांनो सावधान!
मागील चार दिवसापासून डोंगर भाग अंधारात! आणि तुम्ही एसी मध्ये!
मताचा जोगवा मागणाऱ्या सर्व खाजगी व सरकारी यंत्रणेला डोंगर भागातील सर्व सामान्य जनतेचा एक सवाल आहे .आम्ही मागील आठवड्यामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मतदान केलंच नव्हतं की काय? अख्ख्या डोंगर भागामध्ये मागील चार दिवसापासून लाईट नाही. पण प्रशासन मात्र कासवाच्या चालीने लाईट जोडणीचे काम करत असून असेच सुस्त प्रशासन काम करत असेल तर सर्व डोंगर भागातील लोकांना एक चिमणी व जास्तीच रॉकेल पुरवठा करा. दिवा लावण्यासाठी नव्हे हातावर घेऊन बो…ण्यासाठी.
अवकाळी पावसाने अख्ख्या निपाणी तालुक्यामध्ये मागील तीन दिवसां पूर्वी अनेक झाडे उनमळून पडल्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. जिवाची पराकष्टा करत निपाणी भागामध्ये बारा तासांमध्ये लाईटचा पुरवठा केला होता. मग डोंगर भागातील लोकांनी प्रशासनाचे काय घोडं मारले आहे की काय इतकी भयावह परिस्थिती सध्या डोंगर कपारीतील ग्रामीण भागात आहे.
मागील आठवड्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्व यंत्रणा पाहता निपाणी तालुक्यामध्ये सर्वत्र सक्षम प्रशासन उपलब्ध असल्याचा दाखला पावलोपावली आला होता. पण आत्ताची ग्रामीण भागातील लाईट मुळे झालेली पाण्याची परिस्थिती पाहता ही डोंगर भागावर लावलेली आणीबाणीच वाटते.
सर्वसामान्य जनता पाण्याच्या एका थेंबासाठी गल्लीबोळ फिरत आहेत. लहान मुलांचा टाहो रात्रीच्या काळोखात गडद वाटत आहे. तरी प्रशासन मात्र जागे होण्यास तयार नसून डोंगर भागातील पंचायती देखील निकालाच्या प्रतीक्षेत बसून आम जनतेला वाऱ्यावर सोडण्यात धन्यता मानत आहे. काही पंचायतीच्या पिडीओचे दर्शन मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून एकेक पंचायतीला झालेले नाही. त्यामुळे गावातील पाण्याची समस्या सोडवण्यास ग्रामपंचायत सदस्य देखील हातबल झाले असून डोंगर भागातील लोकांना सध्या कोण वाली असल्याचे दिसत नाही.
सध्या ग्रामीण भागामध्ये मागील चार दिवसापासून झालेल्या लाईटच्या दुरावस्थेमुळे कोणतीही बोरवेल चालू नसल्यामुळे पाण्याच्या भटकंतीसाठी नागरिक मैलोन मैल लांब जाऊन पाण्याची व्यवस्था करत आहेत. पण ग्रामपंचायत प्रशासनाकडून किंवा हेस्कॉम कार्यालयाकडून किंवा तहसीलदार ऑफिस कडून कोणतीही युद्ध पातळीवर उपाययोजना करून लाईट आणण्यास असमर्थता दर्शवत आहेत.
आजचा दिवस जर लाईट न आल्यास रस्त्यावरची लढाई लढण्यास देखील बळ मिळण्यासाठी पाण्याची आवश्यकता नितांत असल्याची आर्त हाक डोंगर भागातील आम नागरिक करत आहेत.
तात्पुरते पाण्याची टँकर पाठवा समस्या मिटवा..
डोंगर भागामध्ये लाईट नसल्याकारणाने पाण्याची भीषण टंचाई भासत असून डोंगर भागातील आठ ते नऊ गावांना लवकरात लवकर पाण्याचं टँकर पुरवून तात्पुरत्या समस्येचा तोडगा काढण्याचे आर्त आवाहन सर्वसामान्य जनता करत आहे.