मेतके तेथे रमेश वसंत भारमल यांच्या घरी धाडसी चोरी!
तब्बल सहा तोळ्यापेक्षा जास्ती सोनं घेऊन चोरांचा पोबारा!
मागील महिन्यापासून चालू असलेल्या अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे व मान्सून सक्रिय झाल्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी रानं तयार करून शेतकरी राजा सध्या खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे..
शेतकरी राजाची पेरणीची लगबग चालू असतानाच याच गोष्टीची संधी साधत दिवसाढवळ्या दुपारी 11 ते 2 या दरम्यान मेतके येथे धाडसी चोरी करून चोरांनी तब्बल सहा तोळे सोन्यावर डल्ला मारून पोबारा केला.
घटनास्थळावरून व पोलिस रिपोर्टच्या आधारे असे समजते की रमेश वसंत भारमल वय 37 राहणार मेतके तालुका कागल यांच्या घरी तसेच आप्पासाहेब ज्ञानू कांबळे यांच्या घरी काल दुपारी अकरा ते दोन दरम्यान धाडसी चोरी झाली. या चोरीमध्ये तीन तोळे वजनाचा राणीहार, अडीच तोळे वजनाचा कोल्हापुरी साज, तसेच सव्वा तोळा वजनाची भोहरमाळ असा भारमल यांचा ऐवज तर कांबळे यांची अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे डोरले असे एकूण चार लाखाहून अधिक रुपयाचा ऐवज चोरट्यानी लंपास केला आहे.
पेरणीची धांदल असल्यामुळे सर्वच खेडेगावांमध्ये लवकर शेतवाडी वर जाऊन पेरणी करण्याची लगभग असल्यामुळे याची संधी साधून चोरट्यानी समोरील दरवाजचे कुलूप तोडून आत प्रवेश करून लोखंडी तिजोरीचे कुलूप काढून सदर चोरी केल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात मुरगूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी रमेश वसंत भारमल यांनी फिर्याद दिली आहे. मुरगुड पोलीस स्टेशनचे पी आय व सर्व कर्मचारी कसून पुढील तपास करत आहेत.
दरवाजाचे कुलूप तोडले पण आतील तिजोरी चक्क चावीने उघडली..…
या चोरी दरम्यान एक विलक्षण प्रकार घडला अनेक चोरीमध्ये चोर कुलूप तोडून चोरी करतो. पण या चोरीमध्ये चोरट्याने रितसरपणे ठेवलेल्या जागची किल्ली घेऊन तिजोरी उघडून शिताफिने चोरी केल्यामुळे चोर हा ओळखीचा असल्याचे घटनास्थळावरून दबक्या आवाजात बोलले जात होते.
घराला कुलूप बघून डाव साधला…..
श्री भारमल यांच्या घरी सहा ते सात सदस्य असल्यामुळे त्यांच्या घरी कोणी ना कोणी असते. त्यामुळे घराला कुलूप घालून बाहेर जाण्याचा प्रसंगच कधी येत नसतो. पण घरातील त्यांची लहान मुले व पाहुण्यांची मुले आल्यामुळे त्यांना घेऊन घरातील एक व्यक्ती बाहेर गेली होती व बाकीची शेताकडे गेली होती त्याचवेळी घराला कुलूप बघून चोराने डाव साधला आहे.
चोरीला गेलेला ऐवज पंधरा दिवसांपूर्वीच केलेला…..
सध्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत पण घरातील एक शुभ कार्य असल्यामुळे व सोन्याच्या किमती किंचित कमी आल्यामुळेच पंधरा दिवसांपूर्वीच राणी हार व कोल्हापुरी साज केला होता. त्याच ऐवजाची चोरट्यांनी चोरी केल्यामुळे परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.