देवचंद कॉलेज मध्ये ‘जागतिक लोकसंख्या दिनाचे’ आयोजन!
प्रा. वाय. बी. पाटील यांचे व्याख्यान!
निपाणी नगरी प्रतिनिधी (26) अर्जुननगर
देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस) विभागामार्फत ११ जुलै रोजी ‘जागतिक लोकसंख्या दिना’निमित्त ‘वाढती लोकसंख्या आणि भारतापुढील आव्हाने’ याविषयावर प्रा. वाय. बी. पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे यांनी भूषविले.
प्राचार्या प्रो. डॉ.जी.डी.इंगळे यांनी ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा करण्याचे महत्त्व सांगितले. लोकसंख्यावाढ या नकारात्मक बाजू बरोबर लोकसंख्या ही त्या-त्या देशाची ताकद असते, अशी सकारात्मक बाजूचेही वर्णन केले. देशाच्या प्रगतीसाठी लोकसंख्येचा कुशलतेने वापर होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी भावी नागरीक म्हणून देशापुढील आव्हाने पेलण्यासाठी समर्थ बनावे, असा आशावाद व्यक्त केला.
‘वाढती लोकसंख्या आणि भारता पुढील आव्हाने’ याविषयावर प्रा. वाय. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘जागतिक लोकसंख्या दिन’ साजरा करण्यामागे लोकसंख्ये विषयी लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, हा उद्देश व्यक्त केला. वाढत्या लोकसंख्येमुळे जगातील अनेक देशांसमोर विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, भारत हा त्यापैकी एक आहे. लोकसंख्या विस्फोट ही देशाच्या प्रगतीसाठी मोठी समस्या आहे. या दिवशी लोकांना कौटुंबिक नियोजन, लिंग समानता, मानवी हक्क आणि महिला आरोग्य याबद्दल माहिती दिली जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे भारतासमोर महागाई, अन्न पुरवठ्याची समस्या, शिक्षण, बेरोजगारी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, पर्यावरणाची हानी, प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होतात. विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्या विषयक जाणीव जागृती झाली पाहिजे, असे मत प्रा. पाटील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास श्रीमती एस. पी. जाधव – उप प्राचार्या , डॉ. ए. एस. डोणर – पर्यवेक्षक, (कनिष्ठ विभाग) उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. पी. पाटील रासेयो कार्यक्रम अधिकारी यांनी केले. आभार प्रा. बी. एस. कुंभार यांनी मानले. कु.सानिका पट्टेकरी, कु.प्राची कुंभार, कु.रोहिणी रावण या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन कु.सरिता कोळी, प्रिया हजारे यांनी केले. याप्रसंगी एन एस एस समिती सदस्य व विद्यार्थी उपस्थित होते.