(Kargil)”कारगिल विजय दिवस” मॉडर्न मध्ये उत्साहात साजरा!
प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी पी.एस.आय उमादेवी गौडा तर मुख्य उपस्थितीमध्ये माजी सैनिक श्री.चारुदत्त पावले होते.!
निपाणी नगरी प्रतिनिधी (26)
बेळगाव मराठा मंडळ संचालित, मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये पंचवीसावा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून निपाणी टाऊन पोलीस स्टेशनच्या पीएसआय उमादेवी गौडा तर प्रमुख उपस्थिती निवृत्त सैन्य अधिकारी श्री. चारुदत्त पावले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्राचार्या श्रीमती स्नेहा घाटगे त्याचबरोबर फ्युचर कॉम्बॅट फोर्स चे सर्व प्रशिक्षक उपस्थित होते. प्रारंभी एस्कॉर्ट विद्यार्थी कु.अवधूत कागले आणि सक्षम हिरेकुडी या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांना व अध्यक्षांना मानवंदना दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कारगील युद्धातील जवानांना श्रद्धांजली वाहून अमरज्योत पेटविण्यात आली.
भारत देश हा विविध परंपरा आणि संस्कृतीने नटलेला स्वर्ग आहे. आम्ही सर्व भारतीय एक आहोत या देशाचे नागरिक आहोत हा गर्व आम्हास असला पाहिजे. कारण अनेकता मे एकता असा आपला भारत देश असून सर्व जाती-धर्म आणि भाषेचा आदर आपण केला पाहिजे असे सांगत असताना तुम्हाला देशसेवा करायची असेल तर फक्त पोलीस अधिकारी किंवा सैन्य अधिकारी होऊन सीमेवर लढायची गरज नाही आपण आपल्या समाजात राहून देखील आपली कर्तव्य प्रत्येक नागरिकांनी जबाबदारीने पार पाडली तर ती देखील देशसेवाच होते. आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी वडीलधाऱ्या आणि शिक्षकांचा आदर केला पाहिजे हे सांगताना विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून विविध स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करून आपले भविष्य उज्वल करावे असे मार्गदर्शन श्रीमती गौडा यांनी केले.
निवृत्त सैन्यधिकारी श्री. चारुदत्त पावले यांनी आपले सैन्यातील अनेक किस्से विद्यार्थ्यांना सांगत असताना 18000 फूट उंच असणाऱ्या कारगिल शिखरा वरती भारतीय सैन्य चढून पाकिस्तान सैन्याला कसे नेस्तनाबूत केले. हे सांगत 26 मे 1999 ते 26 जुलै 1999 पर्यंत दोन महिने जीवाची पर्वा न करता यह दिल मांगे मोअर म्हणत सर्व सैनिकांना प्रोत्साहित करत कॅप्टन भद्रा यांनी एक एक टप्पा पार करत तिरंग्याची आन-बान शान रोशन करत कारगिल शिखरावर तिरंगा फडकवलेले किस्से ऐकून खरोखरच अंगावर शहारे येत होते. कारगिल युद्धात आपल्या भारत मातेच्या संरक्षणासाठी पाचशेहून अधिक विरजवान शहीद झाले तर हजारो वीर घायाळ झाले होते. त्यांच्या या बलिदानात आणि कुटुंबीयांच्या त्यागात प्रत्येक भारतीय ऋणी असेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना युवा वर्गाने व्यसनापासून दूर राहावे पंगत चुकली तर एक वेळचे जेवण चुकते पण संगत चुकली की आयुष्याची दिशा चुकते यासाठी योग्य माणसं बरोबर असणं किती गरजेचे असते या उदाहरणातून विद्यार्थ्यांना सांगितले. त्यापुढे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी समाजात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. मुलांनी जीवन असे जगायचे की लोक तुम्हाला तुमच्या वडिलांच्या नावाने नाही तर तुमच्या नावाने वडिलांना ओळखले पाहिजे. अशी छबी आणि असा रुतबा आपण समाजात निर्माण केला पाहिजे. पुस्तकात झुकलेल्या माना पुढे आयुष्यभर ताठ मानेने जगतात त्यासाठी पुस्तके वाचणे किती महत्त्वाचे आहे हे देखील प्राचार्यांनी मुलांना सांगितले. आपण कायम समाजसेवेसाठी आणि देश सेवेसाठी तत्पर राहिले पाहिजे. आयुष्यात शिस्त खूप महत्त्वाची आहे विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी शिस्त लावून घ्यावी असे मार्गदर्शन देखील त्यांनी केले.
तसेच या कार्यक्रमांमध्ये शाळेचे विद्यार्थी कु.समर्थ पाटील, कु. दर्शन मारापुरे कु सिमरा जमादार कु. स्वरा जाधव आणि कु. पल्लवी गायकवाड यांनी भाषणे सादर केली. तसेच जिल्हास्तरीय स्काऊट आणि गाईड देशभक्ती गीत स्पर्धेतील विजेते चिमुकले कब आणि बुलबुलचे विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गीत सादर केले आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या गीतावर नृत्य आणि योगा पिरँमिडची कौशल्ये प्रदर्शित केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.सई चव्हाण व कु. मानसी कांबळे यांनी पार पाडले. तर प्रमुख पाहुण्यांची ओळख कु. तेजस्विनी घोरपडे हिने केले. आणि कु. सानिया मोकाशी हिने आभार मानले.