ग्रामीण भागात सोयाबीन मळणी जोरात!
पण बळीराजाच्या पिकाला मिळणार का योग्य दर?
निपाणी नगरी प्रतिनिधी (17)
खराब वातावरण आणि ऊनपावसाचा लपंडाव चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्यासाठी एकच लगबग चालू झालेली आहे. सकाळी दैवारात लवकर जाऊन सोयाबीन काढणे किंवा रात्री चांदण्यात 2 तास सोयाबीन काढून सकाळी 9 नंतर ऊन पडलं की सोयाबीन एकत्र करून मळणी करण्याची एकच धडपड शेतकरी व कामगारांची चालू झालेली सगळीकडे पहायला मिळत आहे. कामगारांचा तुटवडा भासत असल्याने पैरा पद्धतीने किंवा एकरा प्रमाणे खंडित रक्कम ठरवून त्या शेतकऱ्याचे सोयाबीन काढणे, मळणी करून सोयाबीन पोती शेतकऱ्याच्या घरात टाकणे या पद्धतीचा सर्रास अवलंब केला जात आहे. कांही भागात मळणी झाल्यावर रात्री जेवणाचा बेत आखून त्यावर ताव मारला जात आहे.तर कांही ठिकाणी दिढी पगार देऊन चहा नाश्ता शेतीशिवारात आणून देऊन मळणी चालू आहे. काढलेल्या सोयाबीनवर जरा पावसाच्या सरी पडल्या तरी ते मऊ पडल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मिळेल त्या ट्रॅक्टर मशीनच्या सहाय्याने मळणी कामात शेतकरी राजा व्यस्त दिसत आहे.
पण हे सर्व सोपस्कार मिटवून धान्य घरात आल्यानंतर त्याला जर योग्य दर मिळाला नसेल तर बळीराजाचे नुकसान नेहमीप्रमाणे ठरलेले आहे. त्यामुळे प्रशासनाने सोयाबीन साठी जो हमी भावाची हमी दिली आहे. ती पूर्ण करून शेतकरी राजाला न्याय देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ग्रामीण भागामध्ये फिरून सोयाबीन खरेदी करणाऱ्या टेम्पो वाल्यांचे काटे देखील परिसरात तपासले जात असून. त्याने देखील फॅक्टरीपेक्षा थोडा कमी भाव देऊन पण योग्य काटा करून शेतकऱ्यांचे नुकसान थांबवले पाहिजेत.