निपाणीत मराठी भाषेला अधिकृत अभिजात दर्जा प्राप्त झाल्याबद्दल बैठकीचे आयोजन!
साहित्यिक अजित सगरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा तज्ञ प्रा. नानासाहेब जामदार हे होते!
निपाणी नगरी प्रतिनिधी (07)
मराठी भाषा ही मुळातच अभिजात भाषा असताना सुद्धा तिला आज तागायत अभिजात भाषेचा दर्जा मिळाला नव्हता. या अभिजात भाषे संदर्भात केंद्र शासनाचे जे निकष असतात ते निकष पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डॉ. रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने सखोल अभ्यास करून आवश्यक सर्व अटींची पूर्तता करून केंद्र शासनाला आपला अहवाल पाठवला होता. त्यानंतर केंद्र सरकारने तत्वतः अभिजात दर्जा देण्याचे मान्य केले. परंतु तो लवकर मिळत नव्हता. गेली काही वर्ष सातत्याने सीमा भागातील साहित्यिक, कलाकार, कलावंत आणि मराठी भाषिकांसह विविध शैक्षणिक संस्था, विविध साहित्य संस्था, निरनिराळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था , यांनी यासाठी निपाणी भागातून ही वेळोवेळी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याशी पत्रव्यवहार, मोर्चे, लोकलढे, उभे केले. शिवाय यासाठी महाराष्ट्र शासनाने व नेमलेल्या समितीने सातत्याने पाठपुरावा केला. त्याचवेळी संसदेमध्येही अनेक खासदारांनी वेळोवेळी हा प्रश्न उपस्थित केला. या सर्व गोष्टींची गांभीर्याने दखल घेऊन, भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्र महोत्सव घटस्थापने सुरुवात होतो आणि याच दिवशी अचानकपणे केंद्र सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर यावेळी मराठी बरोबर पाली, प्राकृत, बंगाली या भाषांना ही हा दर्जा जाहीर केला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि सीमा भागात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
निपाणी मध्ये या प्रश्नासाठी निपाणी भागातून राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती, केंद्रिय सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय सांस्कृतिक मंत्री या सगळ्यांच्या बरोबर सातत्याने विविध मार्गाने पाठपुरावा करण्यात आला होता. या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैठक घेण्यात आली याप्रसंगी साहित्यिक अजित सगरे यांनी याप्रसंगी वरील प्रमाणे आपले प्रास्ताविक व्यक्त केले.
साहित्यिक अजित सगरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठी भाषा तज्ञ प्रा. नानासाहेब जामदार हे होते. त्यांनी या मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या निर्णयाचे स्वागत करून, अभिजात दर्जा काय असतो. आणि त्याचे कोणते फायदे असतात. यासंबंधी विचार मांडले. याप्रसंगी विविध संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बाबासाहेब मगदूम, जयराम मिरजकर,प्रा.एन आय खोत, सुशील कुमार कांबळे ,साहित्यिक कबीर वराळे यांनी आपले विचार मांडले. यावेळी प्रशांत गुंडे, प्रा.नवीजन कांबळे , किरण कांबळे, अकबर कांबळे, भूतपूर्व सैनिक विजय निर्मळे, नंदू माने , रवी शिंदे , इत्यादी मान्यवर हजर होते. आभार बाबासाहेब मगदूम यांनी मानले.