दहा महिने अविरत सुरू असलेली जनसेवा थाळी 1 डिसेंबर पासून तूर्तास बंद
तळेगाव : कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात बाहेर गावातून आलेल्या रुग्णांचे नातेवाईक, वाटसरू, गोरगरीब जनता यांच्यासाठी सुरू करण्यात आलेली जनसेवा थाळी 1 डिसेंबर 2021 पासून तूर्तास बंद करण्याचा निर्णय जनसेवा विकास समितीने घेतला आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून मराठी क्रांती चौकात सुरू असलेल्या जनसेवा थाळीवर दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत 5 रुपयात पोटभर जेवण दिले जात होते.लॉकडाऊन मध्ये सर्व काही बंद असल्याने पैसे असूनही उपाशी राहण्याची वेळ अनेकांवर आली होती.नागरिकांची अडचण लक्षात घेऊन जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
परंतु आता सर्व काही पूर्वपदावर येऊ लागल्याने थाळी घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अन्न वाया जाते. या कारणास्तव तात्पुरती जनसेवा थाळी बंद करत असल्याची माहिती जनसेवा विकास समितीचे कार्याध्यक्ष कल्पेश भगत यांनी दिली. नागरिकांवर येणाऱ्या प्रत्येक संकटात जनसेवा विकास समिती नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असेल अशी ग्वाही किशोर आवारे यांनी यावेळी दिली.