वाईन विक्रीला सुपर मार्केट आणि किराणा दुकानात परवानगी देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय दुर्दैवी – अण्णा हजारे
मुंबई : वाइन विक्रीला सुपर मार्केट आणि किराणा दुकानात परवानगी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने नुकताच घेतल्याने केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत असल्याचे पाहून दुःख होते अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून अमली पदार्थ मद्यपान यापासून दूर ठेवणं तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. असे असताना केवळ आर्थिक फायद्यासाठी मद्यपान आणि व्यसनाधीनतेला मोकळे रान करून देणारे निर्णय घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे हित जपायचा असेल तर गोरगरीब सामान्य शेतकरी आपल्या शेतात जे पिकवतो त्याला राज्य आणि केंद्र सरकारने हमीभाव द्यायला हवा. परंतु सरकार 1 हजार कोटी लिटर वाईन विक्रीचे उद्दिष्ट ठेवून नेमके काय साध्य करणार ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लोक व्यसनाधीन होऊन बरबाद झाले तरी चालतील पण सरकारचा महसूल वाढला पाहिजे असा अट्टाहास या सरकारचा आहे का ? अशी बोचरी टीकाही अण्णा हजारे यांनी केली.