सोमटणे येथील टोलनाका तीन महिन्यात बंद न केल्यास आंदोलन करणार – किशोर आवारे
तळेगाव : मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील टोलनाक्या संदर्भात जनसेवा विकास समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. सदर टोलनाका तीन महिन्यात बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांनी दिला आहे. आज एमराॅल्ड रिसॉर्ट येथे यासंदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यापूर्वीही किशोर आवरे यांच्या पुढाकारातून सोमाटणे येथे या विरोधात सर्वपक्षीय आंदोलन झाले होते.परंतु त्यावेळी पोलिस प्रशासनाने सामंजस्याची भूमिका घेण्याची विनंती केल्याने आंदोलन थांबविण्यात आले.
केंद्र सरकारच्या नियमानुसार दोन टोलनाक्यां मधील अंतर साठ किलोमीटर असावे. परंतु लोणावळा टोलनाक्यापासून सोमाटणे टोलनाक्यापर्यंतचे अंतर हे केवळ 32 किलो मीटर आहे.तर खेड शिवापूर ते सोमाटणे टोलनाका यातील अंतर 52 किलोमीटर पर्यंत आहे .हा टोलनाका केंद्राच्या नियमानुसार नसल्याने तो बंद करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व विकास मंत्री नितिन गडकरी यांनी 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन टोलनाके येत असतील तर तीन महिन्याच्या आत टोल नाका बंद करण्यात येईल असे लोकसभेत जाहीर केले.सोमाटणे येथील टोल नाका बंद करावा यासाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर हे मागील वर्षभरापासून न्यायालयीन व लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आहे.
यावेळी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर म्हणाले, फेब्रुवारीत सोमाटणे टोल नाक्यावरून 3 लाख 21 हजार वाहने धावली. यातून 3 कोटीचा टोल वसूल झाला अशी माहिती सरकारी वेबसाईट वर उपलब्ध आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यातच 3 लाख 6 हजार वाहने टोल न देता गेली अशी माहितीही आहे. एखाद्या टोलनाक्यावरून एवढ्या मोठ्या प्रमाणात टोल चुकवून वाहने कशी पळून जाऊ शकतात हा एक संशोधनाचा विषय आहे. या सर्व आकडेवारीची कोणतीही शहानिशा न करता सरकारी वेबसाइटवर प्रकाशित केली जाते हे दुर्दैवी आहे.दोन महिन्यापूर्वी एक्सप्रेसवेच्या बाबतीत हीच गोष्ट आम्ही दाखवून दिली होती. या सर्व प्रकाराची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत विवेक वेलणकर यांनी केली.