भंडारा डोंगर येथे ‘काव्यग्रंथ पारायण’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन
तळेगाव : येथील साहित्य कला आणि संस्कृती मंडळाच्या वतीने कविवर्य शंकर वैद्य यांच्या संपादित केलेल्या आणि कॉन्टिनेन्टल प्रकाशनने 51 वर्षांपूर्वी प्रकाशित केलेला लोककवी मनमोहन नातू यांच्या आदित्य काव्यग्रंथ यांचा पारायण सोहळा गुरुवार (दि.11 नोव्हेंबर) रोजी श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे संपूर्ण दिवस पार पडला.
या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन विठ्ठल रुखमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे सचिव जोपाशेट पवार यांनी केले. तर अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक व पिंपरी-चिंचवड माजी नगरसेवक अरुण बो-हाडे यांनी भूषविले.
संस्थेचे संस्थापक व मुख्य विश्वस्त ॲड. सहदेव मखामले यांनी काव्य ग्रंथ पारायण याबाबतची पार्श्वभूमी सांगून लोककवी मनमोहन यांच्या विपुल साहित्याचा काव्यलेखन याचा सविस्तर आढावा उपस्थितांसमोर मांडला. तसेच संस्थेच्या नवनिर्वाचित महिला कार्यकारणीचे व उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष ॲड. रंजना भोसले यांनी हा सुद्धा प्रगत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या सानिध्याने पावन झालेल्या या भूमीत आयोजित करण्याची संस्थेच्या संस्थापकांची कल्पना अभिनव आहे असे सांगत उत्तमोत्तम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमच्या महिला कार्यकरणीला सगळ्यांनी भरभरून सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यानंतर संत तुकाराम महाराज वाङमयाचे अभ्यासक विठ्ठलराव काळोखे यांनी भंडारा डोंगराचे चरित्र व्याख्यान सादर केले. पारायणाचे कौतुक करणारी तसेच लोककवी मनमोहन यांच्या साहित्यावर जीवनावर भाष्य करणारी विश्वस्त जोपाशेठ पवार, रामभाऊ कराळे, प्रतिभा पायगुडे यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. याप्रसंगी उदय नातू साधना जोशी यांनी रचना सादर केल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे,जगन्नाथ नाटक, यांच्या सह पारायण कार्यक्रमात ॲड. सहदेव मखाले, ॲड. रंजना भोसले स्नेहल बाळसराफ, आरती पेंडभाजे, ज्योती शिंदे, निशा पवार,ॲड. सीमा जाधव – शर्मा, अनुराधा पवार, अमृता चव्हाण – देशमुख, शैलेश मखामले आणि श्रीकांत पेंडसे यांनी सक्रिय सहभाग घेतला.