कामशेतमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग
कामशेत : कामशेत ही सत्तर गावांची बाजारपेठ असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. त्यात आठवडे बाजाराला काही अंशी सुरुवात झाल्याने भाजीपाल्याचा कचरा येथे नेहमीच पहावयास मिळतो. आठवडे बाजार सुरू असतानाच पवना नगर रस्त्यालगत असलेले भाजीविक्रेते रोजच भाजी विकत असल्याने त्यातून उत्पन्न होणारा कचरा नित्याचाच आहे.
पंतप्रधानांपासून गावपातळीपर्यंत स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु कामशेतकर ह्या अभियानालाच ‘कचऱ्याची टोपली’ दाखवत असल्याने कामशेतमध्ये कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कामशेत ग्रामपंचायतीकडून रोज कचऱ्याची घंटागाडी कचरा गोळा करण्यासाठी फिरवली जाते असे असतानाही कामशेत मध्ये रोजच कचरा पहावयाला मिळतो.
कामशेत मधून मुंबईकडून पुण्याकडे जाताना कचऱ्याचे ढीग लागलेले पाहायला मिळतात. त्या कचऱ्यावर कुत्री ताव मारतानाही पाहायला मिळतात. अश्यातच कामशेतकरांचे आरोग्य धोक्यात असलेले पाहायला मिळते आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्र राज्यासह मावळ तालुक्यात काही दिवसांपासून वाढत आहे. अश्यातच स्वच्छतेची त्रिसूत्री कामशेत कर पाळत नसल्याचे चित्र आहे.