हजारो नागरिक सहा वर्ष मूलभूत सुविधांपासून वंचित ; जन्म-मृत्यूचा दाखलाही मिळेना
तळेगाव : मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथील जवळपास दोन हजार रहिवाशांना आपण भारतीय आहोत का ? असा प्रश्न पडला आहे. पीएमआरडीएचे दुर्लक्ष आणि बिल्डरच्या हात झटकण्याचा वृत्तीमुळे हे नागरिक गेले सहा वर्षापासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.
इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे या क्षेत्राचा पीएमआरडीए हद्दीत समावेश होतो. मात्र पीएमआरडीए येथील रहिवाशांना मूलभूत सुविधाही पुरवत नाही, की तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत समावेशासाठी मंजुरी देत नाही. बिल्डर अरेरावी करत सदनिकाधारकांच्या तक्रारीकडे कानाडोळा करतात. त्यामुळे येथील रहिवाशांना पिण्याचे पाणी, रहिवासी दाखले,मतदान यादीत नाव, रस्ते, सांडपाणी व्यवस्था यापासून वंचित राहावे लागत असून जन्म-मृत्यूचा दाखला मिळत नसल्याने आपण भारतीय नागरिक आहोत का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी बोलताना रहिवाशी म्हणाले, वर्षानुवर्ष मृत्यूचे दाखले मिळत नाही. कोर्टाने आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने मृत्यूचा दाखला दिला अशी कैफियत एका महिलेने मांडली. या भागातील नागरिकांना जन्म-मृत्यूचा दाखला मिळत नाही , विवाह नोंदणी होत नाही असेही महिला म्हणाली.
आमच्या मागण्या मूलभूत स्वरूपाच्या असूनही पूर्ण होत नाही. बिल्डर अरेरावी करतात. तर पीएमआरडीए दुर्लक्ष करते .आमच्या भागात सुविधा व्हाव्यात अशी अशी आमची साधी मागणी आहे असे येथील रहिवाशी म्हणाले.
प्रशासनाचा ढिसाळपणा तसेच पीएमआरडीए व बिल्डरचे संगनमत यामुळे आम्ही आमच्या हक्कांपासून वंचित आहोत असा आरोप येथील रहिवाशांनी केला. वारंवार तक्रार आणि पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याने बिल्डर विरोधात गुन्हा दाखल करून पीएमआरडी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा इंद्रपुरी मधील रहिवाशांनी दिला आहे.