पूरग्रस्त भागातील अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठान स्विकारणार
पुणे : सातारा येथील पूरग्रस्त भागातील अनाथ झालेल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ज्या मुलांनी आपले पालक या दुर्घटनेत गमावले आहेत, त्यांचे शैक्षणिक पालकत्व भोई प्रतिष्ठानाने स्विकारले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत पुण्यातील ‘भोई प्रतिष्ठानाचे’ वैद्यकीय मदत पथक गेले काही दिवस कोयनानगर परिसरातील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी कार्यरत आहे.येथे पूर्ण राज्यभरातून जीवनावश्यक वस्तूंची मदत येत आहे. पण ज्या बांधवानी आपले प्रियजन या दुर्घटनेत गमावले आहेत, त्यांना भावनिक व मानसिक आधार देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्या अस्मानी संकटाने त्यांना खूप मानसिक धक्का बसला आहे. या बांधवाना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी ‘भोई प्रतिष्ठानाच्या’ वतीने ‘कोयना नगर मैत्री प्रकल्प’ सुरु केला असून यामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते, समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर्स यांचा समावेश आहे.
शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व उपाययोजना संस्थेच्या वतीने करण्यात येणार असून या शिक्षण-सेवा प्रकल्पाचा शुभारंभ रविवार दिनांक २२ ऑगस्ट रक्षाबंधनाच्या दिवशी पुण्यात करण्यात येणार आहे.या गावातील बांधवाना व छोट्या मुलांना राखी बांधून, त्यांचे अश्रू पुसून त्यांनी पुन्हा जिद्दीने व जोमाने उभे राहावे यासाठी भोई प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनास राज्यभरातून उत्सफुर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नामवंत शिक्षण संस्थां या प्रकल्पास प्रतिसाद देणार असल्याचे प्रतिपादन भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांनी केले आहे.