वीजबिलावरून आपच्या थेट राहुल गांधीना कानपिचक्या
वीजबिल सवलत महाराष्ट्राला द्यायला कॉंग्रेस मुहूर्त शोधते आहे का ? आपचा सवाल
पुणे :क्रांतीदिनी महाराष्ट्राच्या विविध शहरातून आम आदमी पार्टीने स्थानिक कॉंग्रेस नेत्यांच्या भेटी घेऊन थेट राहुल गांधीना पत्र देत वीजबिल सवलतीबाबत विचारणा केली. कॉंग्रेस चे सर्वेसर्वा राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी आसाम, केरळ व त्यापूर्वी दिल्ली निवडणुकी दरम्यान आपल्या घोषणापत्रातून नागरिकांना कॉंग्रेस सत्तेवर आल्यास आसाम मध्ये २०० युनिट, केरळ मध्ये १०० युनिट तसेच २०२० मधील दिल्ली निवडणुकीत ३०० युनिट वीज मोफत देण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मग महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असताना या आश्वासनाची पूर्तता का करीत नाही? असा सवाल आम आदमी पार्टीने केला आहे .
महाराष्ट्रात महाविकास आघाडी मध्ये कॉंग्रेसही सहभागी आहे आणि कॉंग्रेसचे डॉ नितीन राऊत राज्याचे वीजमंत्री आहेत. त्यांनीही दिवाळीपूर्वी राज्यातील जनतेला १०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. परंतु त्याची आजवर अमलबजावणी झाली नाही. कोविड-१९ महामारी दरम्यान राज्यातील उद्योग, व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे बंद झाले होते, यामुळे सामान्य नागरिक आर्थिकदृष्ट्या फारच संकटात आले आहेत. दुसर्या लाटे दरम्यान अनेकांनी वीजबिल भरले नाही, त्यामुळे आता मोठ्याप्रमाणात आपले वीजमंत्री वीज कनेक्शन कापण्याची कार्यवाही करीत आहेत. जे अन्यायकारक आहे. अशी टिपण्णी आप चे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे यांनी केली आहे . पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरातून अशी पत्रे देण्यात आली.
या दुसर्या कोरोना लाटेमध्ये मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्याचे ज्यांचा वीज वापर २०० युनिट पर्यंत आहे, त्यांना दिल्लीतील केजरीवाल सरकार ज्याप्रमाणे नियमित २०० युनिट वीज मोफत देत आहे त्याप्रमाणे राज्यातील जनतेला सूट द्यावी अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य सुद्धा भारत देशातील एक राज्य आहे, जर इतर राज्यात काँग्रेस घोषणा करते तर इथे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत कॉंग्रेस सहभागी असतांना असा दुजाभाव करू नये व जनतेस दिलेली आश्वासने पाळवीत ही जनतेच्या वतीने मागणी करीत आहोत, अश्या कानपिचक्या आम आदमी पार्टीने या पत्रातून दिल्या आहेत.
आज पुण्यात आम आदमी पार्टीने कॉंग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी व रमेश बागवे यांना हे पत्र सुपूर्त केले , त्या वेळेस आप चे मुकुंद किर्दत, संदिप सोनवणे, संदेश दिवेकर, विद्यानंद नायक, सैद अली,सतीश यादव असगर बेग , किरण कांबळे, विक्रम गायकवाड, ललिता गायकवाड, पारखी, सुभाष करांडे, नरेंद्र देसाई, संतोष पाटोळे आदी उपस्थित होते.