तळेगावकर रसिकांनी अनुभवली एक काव्यमय संध्याकाळ ……….
कलापिनी काव्य मंचाचे पुनश्च हरी ॐ !
तळेगावकर रसिकांनी अनुभवली एक काव्यमय संध्याकाळ ……….
कलापिनी काव्य मंचाचे पुनश्च हरी ॐ !
आवाज न्यूज तळेगाव दाभाडे प्रतिनिधी २१ जुलै
मध्यंतरी करोना मुळे थांबवाव्या लागलेल्या कलापिनी साहित्य काव्य रसिक मंचाचे पुन्हा नुकतेच अत्यंत उत्साहात व आनंदात पुनरुज्जीवन करण्यात आले. यानिमित्ताने अभिजात काव्य अविष्कार” शब्दगंध” पुणे, यांच्या कलाकारांनी काव्यवाचनाचा अतिशय बहारदार कार्यक्रम सादर केला. यामध्ये अरविंद परांजपे, सीमा परांजपे, माधुरी वैद्य, श्रीरंग कुलकर्णी आणि डॉक्टर विनिता आपटे या सर्वांनी एकाहून एक सरस अशा कविता सादर केल्या. काही कविता नवीन होत्या तर काही कविता पूर्वी ऐकलेल्या होत्या. वेगळ्या प्रकारच्या सादरीकरणामुळे पुन्हा त्या नव्याने अनुभवता आल्या.
अरविंद परांजपे यांनी बोरकर यांची “गडद निळे गडद निळे” ही कविता खूप वेगळ्या पद्धतीने सादर केली, शिवाय “मी हजार चिंतांनी” ही संदीप खरे यांची कविता ही सादर केली. माधुरी वैद्य यांनी आधुनिक कवींच्या वेगळ्या विषयावरच्या कविता ऐकवल्या.त्यात फुगडी, ‘तुकाराम आणि शेक्सपियर’, तैलचित्र (शंकर वैद्य), ‘परमेश्वर’ (नीलिमा गुंडी)या कवितांचा समावेश होता. सीमा परांजपे यांनी ‘घर दोघांचे’ (सुधीर मोघे), ‘चाफ्याच्या झाडा, (पद्मा गोळे) ,‘सांगा ना कसे जगायचे’….(मंगेश पाडगावकर) या कविता गाण्यातून सादर केल्या.
श्रीरंग कुलकर्णी यांनी कवितांचे निरूपण करत कविता सादर केल्या. त्यांच्या ‘केळीचे सुकले बाग’ (कवी अनिल) आणि विडंबनकाव्याला प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळाली .डॉक्टर विनिता आपटे यांनी कार्यक्रमाचे निवेदन उत्कटतेने केले. त्यांचे कवितांचे सादरीकरणही अतिशय उत्कृष्ट व भावपूर्ण होते. त्यांनी पैठणी (शांता शेळके), सृजन, महाराष्ट्राचे गीत (वसंत बापट), पृथ्वीचे प्रेमगीत (कुसुमाग्रज) या कविता अतिशय भावपूर्ण रीतीने सादर केल्या. या सगळ्या कविता ऐकताना सारा रसिकवर्ग मंत्रमुग्ध होऊन गेला. कलापिनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन पंडित यांनी केलं,तर प्रास्ताविक डॉक्टर अनंत परांजपे आणि वंदना मालकर यांनी केली.
कार्यक्रमाचे रसग्रहण व आभार प्रदर्शन ज्योती गोखले यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री व सौ पांढरे, अशोक बकरे, शार्दुल गद्रे, चेतन पंडित ,प्रतिक मेहता,सायली रौंधळ व स्वच्छंद या सर्वांनी भरपूर परिश्रम घेतले.
कलापिनी साहित्य काव्यरसिक मंच दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या बुधवारी दुपारी चार ते पाच या वेळेत आपल्या कलापिनी सांस्कृतिक केंद्र येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व रसिक काव्य प्रेमींनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा अशी विनंती कलापिनी काव्य मंचच्या वतीने समन्वयक ज्योती गोखले आणि वंदना मालकर यांनी केली.