बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी यासाठी तहसील कार्यालयावर मोर्चा
वडगाव: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य घटक असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, यासाठी पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालय असा पायी मोर्चा काढण्यात आला.
बैलगाडा शर्यत ही ग्रामीण भागातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या शर्यतीच्या निमित्ताने लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल दरवर्षी होते. शर्यती साठी लागणाऱ्या बैलांची किंमत लाखोंच्या घरात असते. शर्यतीवरील बंदीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो .यामुळे शर्यत पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी शेतकरी, बैलगाडा मालक व बैलगाडा चाहते यांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
बैलगाडा शर्यतीची नाळ अनेक व्यवसायांशी जोडली गेली आहे. या बंदीच्या निर्णयामुळे संबंधित व्यवसायांना मंदीचे दिवस आले आहेत असे राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी निदर्शनास आणून दिले. बैलगाडा मालक हे नेते व आम्ही कार्यकर्ते असे म्हणत यापुढे बैलगाडा मालक बैलगाडा चाहते म्हणतील त्या पद्धतीने आपण सहभागी होऊ असे भेगडे म्हणाले.
यावेळी बाळा भेगडे यांच्यासह गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, दत्तात्रय पडवळ, सुधाकर शेळके, संदीप शेळके, राजू खांडेभरड व शेकडो बैलगाडा मालक व बैलगाडा चाहते उपस्थित होते.