मातीची सुपीकता वाढवायची असेल तर माती परीक्षण अत्यावश्यकच – डॉ. पी. डी. शिरगावे!
देवचंद महाविद्यालया तर्फे अक्कोळ येथे "माती परीक्षण काळाची गरज" या विषयावर चर्चासत्र आयोजित!
देवचंद महाविद्यालय, कृषी रसायने व कीड व्यवस्थापन विभागाने अक्कोळ येथे “माती परीक्षण काळाची गरज” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
देवचंद महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ जी. डी. इंगळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मातीची सुपीकता राखायची असेल तर माती परीक्षण करणे गरजेचे असून माती परीक्षणा मुळे कोणते अन्नद्रव्य प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी आहेत, याची माहिती मिळते. त्यानुसार आवश्यकते प्रमाणे खतांची मात्रा ठरवून नियोजन करणे सोपे जाते. माती परीक्षणा मुळे पैशाची बचत होते, कामगार कमी लागतात आणि शेती किफायतशीर ठरू शकते, असे प्रतिपादन देवचंद महाविद्यालयाच्या कृषी रसायने व किड व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. पी.डी. शिरगावे यांनी केले.
माती विषयी संपूर्ण माहिती, त्यांचे प्रकार, माती कशी तयार होते. सुपीक माती म्हणजे काय , मातीची सुपीकता, मातीतील वेगवेगळी अन्नद्रव्ये, मातीमधील सूक्ष्मद्रव्यांचे महत्त्व या विषयावर सखोल मार्गदर्शन करून चर्चा करण्यात आली. मातीची सुपीकता राखण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा म्हणजे हिरवळीची खते, शेण खते, कोंबडी खत, गांडूळ खत, सूक्ष्मजीव आदींचा वापर अधिक प्रमाणात शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
निपाणी व परिसरातील शेतकऱ्यांना माती परीक्षण करण्यासाठी कोल्हापूर किंवा बेळगाव येथे जावे लागत होते.शेतकऱ्यांचा वेळ व खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांची गरज ओळखून सामाजिक भावनेतून आशिषभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देवचंद महाविद्यालय येथे माती व पाणी परीक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये अत्यल्प दरामध्ये माती परीक्षण करून दिले जात असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असेही आव्हान यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी महाधन कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर संदेश पाटील यांनी महाधन कंपनीने विकसित केलेल्या नवनवीन खतांची माहिती दिली. या चर्चासत्रात अक्कोळ परिसरातील उपस्थित शेतकऱ्यांनी शेतीविषयक अनेक प्रश्न मांडले. तज्ञांनी शेतकऱ्यांच्या शंका निरसन करून मार्गदर्शन केले.
उत्तम सोळांकूरे (श्रीराम फर्टीलायझर्स) यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. किरण आबिटकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमात प्रा. अमृता गोंधळी, एम. एससी, भाग दोन चे विद्यार्थी मृणाल हावळे, मनाली पाटील, निलोफर तासिलदार, श्रावणी वाघमारे, सुनील वारके, ओमकार मडिवाल, तेजस मनगुते प्रथमेश चव्हाण, गणेश गोनुगडे, अक्षय खोत, अक्कोळ येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.