निपाणीत (Shriram Mandir) श्रीरामलल्ला मंदिर अक्षता कलश शोभायात्रा उत्साहात.
निपाणीत सर्वत्र पाठविण्यासाठी 80 मंगल कलशांची बांधणी व सजावट!
अयोध्या येथून निपाणीत आलेल्या श्रीरामलल्ला मंदिर अक्षता कलशांची भव्य शोभायात्रा आज अभूतपूर्व उत्साहात व चैतन्यमय वातावरणात पार पडली. प्रथम रामभक्त भगिनींनी या अक्षतांचा एक मुख्य कलश व निपाणी क्षेत्रात येणाऱ्या सर्व विभागात पाठविण्यासाठी 80 मंगल कलशांची बांधणी व सजावट रामस्मरणात केली. सायंकाळी पाच वाजता परम पूज्य सच्चिदानंद स्वामी (तमनाकवाडा), पूज्य ईश्वरानंद स्वामी (हंचनाळ), पूज्य प्राणलिंग स्वामी (समाधी मठ), श्री श्री श्री आनंद तीर्थ स्वामी (ओम शक्ति मठ, शेंडुर), श्री बसव मल्लिकार्जुन स्वामी (दानम्मादेवी मठ) यांच्या दिव्य सानिध्यात मंत्रोच्चाराच्या भक्तिमय वातावरणात कलश पूजन झाले. त्यानंतर आरती व रामनामाचा जयघोष यांनी परिसर दुमदुमून गेला. आमदार शशिकला जोल्ले व नगरसेवकांनी आरती व कलश पूजनात सहभाग घेतला. श्रीराम मंदिर ट्रस्ट तर्फे सर्व अतिथींचे स्वागत करण्यात आले. आजच्या या दिव्य सोहळ्यात वारकरी सांप्रदाय उत्साहाने सहभागी झाला. ह भ प कावळे महाराज (शिरगुपी), कापसे महाराज, ह भ प नवनाथ घाटगे महाराज (यरनाळ), राजू पोतदार महाराज (आलूर), शंकर हिरेमठ, ह भ प बाबुराव महाजन (वारकरी महामंडळ) इत्यादी संत सज्जनांनी हरिनामाच्या गजराज शोभायात्रेची भव्यता वाढविली. शोभा यात्रेची सुरुवात श्रीराम मंदिर येथून झाली. अगदी सुरुवातीपासूनच मंगल कलश दर्शनासाठी नागरिकांची प्रचंड उत्सुकता दिसून आली. शेकडो वर्षांचा प्रचंड संघर्ष व लाखो राम भक्तांचे बलिदान यानंतर साकारत असलेल्या अयोध्या येथील श्री राम मंदिराची आतुरता सर्व नागरिकांच्या नजरेत या उत्साहातून दिसून आली. प्रथम श्रीराम मंदिर ते साखरवाडी या मार्गात नागरिकांनी पुष्पवृष्टी करून शोभायात्रेचे स्वागत केले. त्यानंतर चन्नम्मा सर्कल पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा सर्व नागरिक व व्यावसायिकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. चन्नम्मा सर्कल येथे देखील यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. कोठीवाले कॉर्नर परिसरात ट्रबलर्स ग्रुप तर्फे आतिषबाजी व पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. स्वस्तिक ट्रेडर्सच्या वतीने मार्गात रांगोळी काढून आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर महादेव गल्ली, महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहाने स्वागत झाले. गांधी चौक ते कोठीवाले कॉर्नर या मार्गात महिलांची कलश दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली. सर्वांनी अतिशय भक्तिभावाने स्वागत केले. त्यानंतर नरवीर तानाजी चौक येथे देखील कलश दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांना वंदन करून बेळगाव नाका मार्गे परत श्री राम मंदिर येथे शोभा यात्रेची सांगता झाली. सर्व सहभागी भक्तांसाठी समाधी मठ येथे प्रसादाची व्यवस्था करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने केले.