देवचंद महाविद्यालयात (Devchand College ) “महिलांचे हक्क आणि कायदे” याविषयावर ॲड.संजीवनी कदम यांचे व्याख्यान!
महिलांना हक्कांबरोबरच कर्तव्यांचीही जबाबदारी पार पाडावी लागते असे मत व्यक्त केले!
येथील देवचंद महाविद्यालयात ‘स्वयंसिध्दा सचेतना ‘मंडळामार्फत “महिलांचे हक्क आणि कायदे” याविषयावर ॲड.संजीवनी कदम यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यघटने मध्ये अंतर्भूत करण्यात आलेले स्त्रियां विषयक हक्क आणि कायदे यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक अशा अनुषंगाने विश्लेषण केले. महिलांना हक्कां बरोबरच कर्तव्यांचीही जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे हक्काचा वापर शस्त्र म्हणून न करता ढाल म्हणून करावे. स्त्री-पुरुष समानता पूर्णपणे प्रस्थापित झाल्याशिवाय स्त्री सबलीकरण यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही. त्यासाठी संविधानातील स्त्रीविषयक हक्क व कायद्यांची जाणीव जागृती ग्रामपातळी पासून करून दिली पाहिजे.असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे म्हणाल्या, कोणतीही मुलगी आई-वडिलांना ओझे बनत नाही. ती “स्वयंसिध्द” असते याची जाणीव मुलीने ठेवावी. त्यासाठी शिक्षणाची कास तिने धरली पाहिजे व उच्चशिक्षणाचा टप्पा गाठला पाहिजे. व स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत कमिटीच्या समन्वयक डॉ. सुषमा जाधव यांनी केले. कार्यक्रमांचे आभार डॉ. सुजाता पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया देसाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. तृप्ती शाह, खजिनदार सुबोधभाई शाह, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ. पी. पी. शाह यांचे सहकार्य लाभले.