देवचंद कॉलेजमध्ये युवक बिरादरीच्या विद्यमाने “माझा जाहीरनामा” हा कार्यक्रम संपन्न.!
युवक बिरादरीच्या दांडी स्मृती संकल्प कार्यशाळेच्या माध्यमातून माझा जाहीरनामा हा कार्यक्रम घेण्यात आला!
देवचंद कॉलेजमध्ये युवक बिरादरीच्या विद्यमान अभिरूप युवा संसदेच्या स्वरूपात ‘माझा जाहीरनामा’ हा कार्यक्रम संपन्न झाला.युवक बिरादरीच्या दांडी स्मृती संकल्प कार्यशाळेच्या माध्यमातून माझा जाहीरनामा हा कार्यक्रम घेण्यात आला.
अभ्यासू नेतृत्व आणि दूरदृष्टीचे धोरण हा राष्ट्राच्या विकासाचा महत्त्वाचा मार्ग आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनकर्त्यांनी आखलेली धोरणे कोणती आणि कशा स्वरूपाची आहेत या विषयीचे चिंतन युवा पिढीकडून केले जावे व त्यातून शासनाला धोरण निर्मितीसाठी योग्य दिशा प्राप्त व्हावी हा मुख्य उद्देश ठेवून सदरची परिचर्चा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रात परिचर्चेत मार्गदर्शन करताना युवक बिरादरीचे संस्थापक क्रांती शाह यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की विद्यार्थ्यांनी आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत चौकस असावे, एक नागरिक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्य पार पाडली पाहिजेत. सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे भान असले पाहिजे हे समजावून सांगताना महात्मा गांधीजी महात्मा का बनले हे गांधीजींच्या जीवनातील घडलेल्या घटनांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. त्यांची सत्य अहिंसा यावर असणारी आढळ निष्ठा त्यांच्यातील नैतिकता आणि आदर्शवाद याचे एक व्यक्ती म्हणून जगताना किती महत्त्व आहे हे स्पष्ट केले. वैचारिक दृष्टी ठेवून युवा पिढीने राजकीय सहभाग दर्शविला पाहिजे व देशाच्या प्रति आपली नागरिक म्हणून असलेली भूमिका कशी पार पाडली पाहिजे या दृष्टीने मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मंथन 2024 या आयोजित केलेल्या युवा अभिरूप संसद स्वरूपात माझा जाहीरनामा या विषयावर स्पर्धेच्या रूपात कार्यक्रम घेण्यात आला. माझा जाहीरनामा या माध्यमातून विद्यार्थ्यांनी राजकीय व्यवस्थे बाबत आपली मनोगते व्यक्त केली. त्यानंतर संसदीय स्वरूपात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी आर्थिक, राजकीय, सामाजिक, आरक्षण, बेरोजगारी, नवी शैक्षणिक धोरण, स्त्रियांची आजची स्थिती आणि सुरक्षितता या विषयांच्या अनुषंगाने आजच्या समस्या आणि वास्तव तसेच शासनाकडून अपेक्षा यावर चर्चा केली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून तीन उत्कृष्ट मनोगतांना श्री.प्रणय कृष्णात दवडते, कु अमृता आनंद संकपाळ, कु.बुद्धी परीट यांना प्रत्येकी 2500/ – चे पारितोषिक देण्यात आले. तसेच गटचर्चा आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून 13 विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात कोल्हापूर विभागातील युवक बिरादरीचे व्यवस्थापन पाहणारे श्री दीपक महाडिक यांनी विद्यार्थ्यांना सक्षम भारत आणि युवकांचा आत्मविश्वास, महाविद्यालयातील युवा विद्यार्थ्यांची नागरिक म्हणून असणारी भूमिका आणि कर्तव्य यावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष आशिषभाई शाह उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जी.डी.इंगळे यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले.
पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.डॉ. पी.पी. शाह यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागाच्या डॉ. सुजाता पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ. अशोक डोनर व कॉमर्स विभागप्रमुख डॉ. आर .के. दिवाकर तसेच डॉ.धनाजी खतकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यशाळेचे संयोजन राज्यशास्त्र विभागाने केले.