उत्तम पाटलांचा काल भरवलेला जनतेचा दरबार खरा आहे का?
अनेक कार्यकर्त्यांची गोची होणार असल्याची परिसरात कुजबुज!
मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळावर निवडणुकीत उतरलेले व विद्यमान आमदार व माजी मंत्री शशिकला जोल्ले यांना कडवे आव्हान निर्माण केलेले युवा नेते व युथ आयकॉन उत्तम रावसाहेब पाटील यांचा काल भरवलेला तवदी येथील जनता दरबार खरा आहे का? आणि जर तो खरा असेल तर अनेक कार्यकर्त्यांची गोची होणार असल्याची परिसरात कुजबुज वाढत आहे.
चिकोडी लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या कन्या प्रियंका जारकीहोळी यांच्यात सरळ सरळ लढत होणार असल्यामुळे उत्तम पाटलांची भूमिका काय राहणार याकडे अनेकांची लक्ष होते.
पण मागील एक महिन्यापासून अनेक ठिकाणी खलबत्ते होऊन, अनेक ठिकाणी बैठका होऊन ,कोणत्याही प्रकारचे आश्वासन कोणाकडूनही न मिळाल्यामुळे काल तडकाफडकी कार्यकर्ता हाच माझा पक्ष असून कार्यकर्ते सांगतील हीच पूर्व दिशा असल्याची वल्गना करत काल कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षावर लढत असताना उत्तम पाटील यांनी अनेक बेछूट आरोप करत राळ उठवली होती. त्यामध्ये त्यांनी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी पाठीत खंजीर खुपसला असून, वेळ आल्यानंतर त्यांची जागा दाखवु मला मागील वेळी पक्ष संघटना बळकट करत पाठिंबा द्या पुढच्या वेळी आम्हाला संधी देतो असं सांगणाऱ्यानी आम्हाला उमेदवारीसाठी साधे विचारे देखील नव्हते. काँग्रेस पक्षासाठी इतकी बांधणी करून देखील काँग्रेसचे सदस्यत्व देखील मी घेतलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ता हाच माझा पक्ष आहे असे म्हणत अनेक आरोपांच्या फेरी अनेक ठिकाणी झाडल्या होत्या. व आज तेच कार्यकर्त्यांच्या निर्णयावर अवलंबून राहतात याच गौडबंगाल मात्र काही कळत नाही.
मागील महिन्यातील अनेक भेटीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी देखील त्यांची खलबत्ते चालू होती. व त्याची मुहूर्तमेढ म्हणून परवाच एका सरकारी कंपनीच्या संचालक मंडळावर जोल्ले पाटील एकाच पॅनमध्ये निवडून आले होते. व हे ही जनता अजून विसरलेली नाही. या मंडळावर संचालक पद भूषवताना कोणत्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले होते असा सवाल देखील उत्तम पाटील प्रेमी गटातून होत आहे.
मागील विधान परिषद निवडणुकीमध्ये लखन जारकीहोळी यांना मोलाची साथ देत त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे शिवधनुष्य उत्तम पाटील यांनी पेलले होते. पण त्यांनी कोणत्याही पक्षास म्हणजेच भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस पक्षास पाठिंबा दिल्यास अनेक ग्रामपंचायत मध्ये सत्ता बदल देखील अटळ असल्याचे बोलले जात आहे.
आणि जरी सर्व कार्यकर्त्यांचा मान राखत त्यांनी काँग्रेस उमेदवारांना (बोली भाषेत बाहेरून) पाठिंबा दिल्यास भविष्यातील निपाणी मतदारसंघाची वाटचाल कशी असेल व निपाणीतील काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांना सामावून घेतील की परत एकदा उत्तम पाटलांना कार्यकर्त्यांचा मेळावा भरवुन निर्णय घ्यावा लागेल हे काळच ठरवेल.