“त्या” सायबर चौकातील अपघातातील कार विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंची!
झालेल्या भीषण अपघातात कुलगुरूंसह तीन ठार तर तीन जखमी! घटना सीसीटीव्ही मध्ये कैद!
परवाच घडलेल्या पुण्यातील पोर्शे कारच्या अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आता कोल्हापूर मध्येही भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने सहा जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर मधील सायबर चौकात हा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर आहेत. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची वृत्त समजतात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यात महत्वाची बाब म्हणजे तब्बल 6 जणांना चिरडणारी ती कार शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरुंची असल्याचे समोर आले आहे. ते स्वतः ही गाडी चालवत होते. दरम्यान व्ही एम चव्हाण यांची तब्येत बरी नसतानाही ते कार चालवत होते. यामुळं गाडीचा ताबा सुटल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचं बोललं जातंय. या थरकाप उडवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
हा अपघात इतका भीषण होता की, कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि इतर तिघांची परिस्थिती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मृतां पैकी हर्षद पाटील वय 16 , अनिकेत चौगुले वय 25 , आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू व्ही एम चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे.