तहसीलदार प्रवीण कारंडे यांची अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठक!
बैठकीत विविध विषयावरून अनेक अधिकारी धारेवर! कोणतीही काम वेळेतच पूर्ण करावे लागणार!
काल निपाणी येथील शासकीय विश्रामधाम येथे आयोजित केलेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरत जाब विचारणारे नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे काल वेगळ्याच मूडमध्ये दिसत होते. त्यांच्या बोलण्यामध्ये काल आश्वासक भाव दिसत होता , त्यांची ही कारकीर्द निपाणीकरांसाठी थोडी दिलासा देणारी ठरणार अशी चिन्हे आहेत कारण…..
निपाणी तालुक्यामधील पूरस्थिती व अतिवृष्टी संदर्भात अधिकारी वर्गाने एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. कोणताही अधिकारी वर्गाने कामांमध्ये हलगर्जीपणा केल्यास किंवा कोणताही भेदभाव झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जागेवर निलंबित करण्याचा इशारा तहसीलदार कारंडे यांनी दिला. ते काल येथील शासकीय विश्रामधामात तालुका पातळीवरील सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. बैठकीत विविध विषयावरून कारंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरून कान उघडणी केली.
निपाणी तालुक्यातील कोगनोळी गावामध्ये शंभर घरांची पडझड झाली असून अजून पर्यंत तेथील ग्रामविकास अधिकाऱ्यांनी योग्य ते पंचनामा करून अहवाल सादर न केल्याबद्दल कारंडे यांनी अधिकाऱ्यांना सोमवार पर्यंत कोगनोळी सह सर्व पुरामुळे किंवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांचा सर्वे करून, जागेचे जी.पी.एस करून अहवाल देण्याचे आदेश दिले. यासह बैठकीत ठरलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन झाल्यास जाग्यावर निलंबन करण्याचे सुतोवाच तहसीलदारांनी केले.
निपाणी तालुका बीआरसी शिक्षण अधिकारी श्री कागे यांना तालुक्यातील सर्व पडझड झालेल्या शाळा, अंगणवाडीची दुरुस्तीचा लेखी अहवाल तहसीलदारांनी मागितलेला आहे, हेस्कॉम अधिकारी अक्षय चौगुले यांना डोंगर भागातील विजेच्या लपंडावा संदर्भात विचारणा करून सरकारी जागेवर लवकरात लवकर सब स्टेशनची निर्मिती करून नागरिकांना न्याय देण्याचे आदेश केले. तसेच नगरपालिकेच्या मार्ग सूचनेनुसार शहरात डेंगी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापना बरोबरच कशहर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी देखील पार्किंगची व्यवस्था मार्गी लागण्या संदर्भात देखील सूचना केल्या. मुख्य मार्गावरून होणारी वाहतूक कोंडी लवकरात लवकर निकाली काढण्याचे आदेश देखील तहसीलदारांनी दिले. या महिन्यात होणाऱ्या 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा देखील बैठकीत घेण्यात आला. या वरील सर्व कामांमध्ये ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक,नोडल अधिकारी, विविध खात्याचे तालुकाधिकारी, यांनी सहभाग घेण्याचे आदेश दिले. बैठकीत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नूतन तहसीलदार प्रवीण कारंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान, पूरग्रस्त स्थलांतरित कुटुंबांना तात्काळ पाच हजार रुपये परिहार निधी, तसेच घराचे पूर्ण नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना 2 लाख 40 हजार रुपये तर एससी एसटी प्रवर्गातील लोकांना 2 लाख 70 हजार रुपये आणि कमी प्रमाणात पडझड झालेल्या कुटुंबांना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगितले, यामुळे कोणताही राजकीय दबाव न घेता दोन दिवसांमध्ये म्हणजे रविवारचा कामाचा दिवस धरून सोमवार पर्यंत पडलेल्या घरांचा सर्वे करून तहसीलदार कार्यालयात अंतिम अहवाल देण्याचे आदेश कारंडे यांनी अधिकारी वर्गाला दिलेले आहे.
यावेळी निपाणी सी पी आय बी एस तलवार, तालुका पंचायत अधिकारी रवी हुक्केरी, पालिका आयुक्त दीपक हरदी, पोलीस प्रशासन, हेस्कॉम अधिकारी, आरोग्य विभाग अधिकारी, फायर ब्रिगेड स्टेशनचे अधिकारी, शिक्षाविभाग, सीडीपीओ, लेबर इन्स्पेक्टर, यांच्यासह निपाणी तालुक्यातील सर्व अधिकारी वर्ग पीडीओ, तलाठी, नोडल अधिकारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.