यरनाळ ग्रामपंचायत कार्यालय उद्घाटनावरून राडा!
ग्रामपंचायत परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप, सर्व नियम धाब्यावर, राडा करणे हा नियम बनत आहे,
निपाणी नगरी प्रतिनिधी (13) यरनाळ
एखाद्या चित्रपटाला शोभेल असा आगळावेगळा कार्यक्रम आज येणार ग्रामपंचायत परिसरामध्ये घडला. वेळ सकाळी 11, ठिकाण यरनाळ ग्रामपंचायत नवीन कार्यालय उद्घाटन सोहळा एवढेच काय ते समजलेले शब्द बाकी सगळा राडा राडा आणि राडाच.
शासनाच्या निधीतून सुसज्ज अशा सर्व सोयींनी युक्त अशी टोलेजंग बिल्डिंग बांधून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. व शासकीय नियमाप्रमाणे याचे उद्घाटन ग्रामपंचायत अध्यक्षांच्या उपस्थितीत व स्थानिक आमदारांच्या मार्गदर्शनाखाली होणे हा झाला नियम पण हे सर्व नियमाचा विसर पडून माझ्या लिखित परवानगीशिवाय किंवा ठरावानुसार स्थानिक आमदार मी दलित अध्यक्ष आहे म्हणून मला डावलून उद्घाटन करीत असून याला माझा व माझ्या ग्रामपंचायत सदस्यांचा पूर्णपणे विरोध असून हे नियमबाह्य काम करण्यास आम्ही मज्जाव करत असल्याचे ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मीबाई अकाराम कांबळे यांनी सांगितले.
त्या आज ग्रामपंचायत परिसरामध्ये अनधिकृत उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या, त्याचवेळी स्थानिक आमदार सौ. शशिकला अण्णासाहेब जोल्ले या ग्रामपंचायत बिल्डिंग स्थळी आल्या. व बंद असलेल्या कार्यालयाचे श्रीफळ वाढवून बाहेरील बाजूस उद्घाटन करून नियोजित कार्यक्रम स्थळी निघून गेल्या.
दरम्यान, आमदारांनी उद्घाटन करून गेलेल्या परिसरात माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार सुभाष जोशी लक्ष्मणराव चिंगळे, रोहन साळवे आले. त्यांच्याबरोबर तालुका पंचायत अधिकारी रवी हुक्केरी, यरनाळ ग्रामपंचायत विकास अधिकारी गायत्री टोण्णे उपस्थित झाल्या. प्रथम श्रीमती टोण्णे, व रवी हुक्केरी यांनी या कार्यालयाचे शासकीय उद्घाटन 17 ऑगस्ट रोजी होणार असून आजचे उद्घाटन चुकीचं असल्याचा निर्वाळा दिला.
वरील सर्व मजकूर वाचुन कोणताही अर्थबोध होत नाही पण ज्याने त्याने राडा संस्कृतीचा वापर करून कार्यक्रम स्थळी पोलीस छावणीचे स्वरूप करण्यास खाद्य पुरवले इतके नक्की.
यरनाळ भारतीय जनता पार्टीच्या ग्रामपंचायत सदस्यांच्या म्हणण्यानुसार …
विरोधकांकडून समस्त दलित समाज बांधवांची दिशाभूल करत असल्याचा यरनाळ ग्रामपंचायत पदाधिकारी सदस्यांचा खुलासा, उद्घाटन कार्यक्रम सर्वांच्या सहमतीने ठरावा नुसारच झाल्याचा निर्वाळा.
यरनाळ ग्रामपंचायत नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत 13 रोजी करण्याचा निर्णय ग्रामपंचायत बैठकीत झालेल्या ठरावानुसार निश्चित केला आहे.असे असताना अध्यक्षांनी कोणाचीही सहमती न घेता उद्घाटन कार्यक्रम 17 रोजी घेतला जाणार आहे असे जाहीर केले. 13 रोजीच्या नियोजनानुसार सर्व पाहुण्यांना निमंत्रण दिले असताना आणि कार्यक्रमाची तयारी पूर्णत्वाला आली असताना कोणतीही सबब न देता कार्यक्रम पुढे ढकलणे चुकीचे आहे. यामुळेच 13 रोजी उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. दलित समाज बांधवांना चुकीचा संदेश देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप भाजपा प्रणित आघाडीच्या ग्रा.प. उपाध्यक्ष व सदस्यांनी विरोधकांवर केला होता.
याविषयी स्पष्टीकरण देताना ग्रामपंचायत उपाध्यक्ष व सदस्य यांनी सांगितले की उद्घाटन कार्यक्रम निश्चित केल्यानंतर पदाधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र बसून निमंत्रण पत्रिका निश्चित केली आहे. याच निमंत्रण पत्रिकेचे वितरण सर्व सदस्यांनी मिळून संबंधित मान्यवर व अधिकाऱ्यांना केले आहे. उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृतीची जोपासना करताना होम हवन विधीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी विद्यमान अध्यक्षा पूजेसाठी बसणार होत्या. पण त्या आल्या नाहीत यामुळे दलित समाजातीलच सदस्येला सदर पूजा विधी पार पाडण्याची संधी दिली गेली.
राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या म्हणण्यानुसार…
आजचा झालेला उदघाटन सोहळ्याचा कार्यक्रम अनधिकृत असून कोणत्याही शासकीय वास्तूचे उद्घाटन करताना शासनातील सर्व अधिकाऱ्यांना बोलवून स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडणे गरजेचे होते. पण एका ग्रामपंचायतीच्या दलित अध्यक्षांना डावलून एका 27 वर्षाच्या दलित खासदाराने पाडल्याचे शल्य मनात ठेवत घिसाडघाई करत उद्घाटन सोहळा पार पडला असून हा सोहळा नसून त्यांनी केलेला राडा आहे. त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानालाच धोका पोहोचवला आहे. व हे आम्ही कदापी सहन करून घेणार नसून शासकीय नियमाप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांच्या व खासदारांच्या उपस्थितीत 17 ऑगस्ट रोजी रीतसर ग्रामपंचायतीच्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा होणार असल्याचे सांगितले. आजचा अनधिकृत कार्यक्रम उधळून लावल्याबद्दल त्यांनी भीमसैनिकांचे विशेष आभार मानले.
सर्व कार्यक्रम पोलिसांच्या साक्षीनेच..
सकाळपासूनच कार्यक्रमाची एकंदरीत कल्पना आल्यामुळे पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह मोठी पोलीस व्हॅन देखील तैनात करण्यात आली होती. आजच्या बंदोबस्तासाठी चिकोडी सी पी आय, निपाणी सी पी आय, शहर, ग्रामीण व बसवेश्वर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी सकाळपासूनच ठिय्या मारून होते. या सर्वांच्या साक्षीनेच आमदार शशिकला जोल्ले यांनी बंद दरवाजा जवळ नारळ फोडला, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्या कडून त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदारांच्या नावांच्या घोषणांनीही परिसर दुमदुमन सोडला. त्या गेल्या त्यानंतर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार काकासाहेब पाटील, उत्तम पाटील गटाचे माजी आमदार सुभाष जोशी, लक्ष्मणराव चिंगळे रोहन साळवे आले. त्यांनी बंद दरवाजा जवळच खुर्च्या मांडून झालेल्या कार्यक्रमावर वरील टीकास्त्र सोडले. न्याय देण्याचे आश्वासन देऊन 17 तारखेच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. झालेल्या घटने संदर्भात आमदारांचा निषेध नोंदवला. घोषणांची सरबत्ती करत परिसर दणाणून सोडला.
पुष्पगुच्छ, बंद दरवाजा व नामफलक पोरकेच राहिले..
पण घोषणांनी परिसर दुमदुमला….
स्थानिक आमदारांना दिलेला पुष्पगुच्छ, बंद दरवाजा, व नाम फलक मात्र आजच्या कार्यक्रमापासून वंचित राहिले. दिलेल्या पुष्पगुच्छ पायदळी पडला होता. बंद दरवाजा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत राहिला, व नामफलक भिंतीवर लागण्या आधीच जमीन दोस्त करण्यात आला.
स्थानिक आमदार आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या जयघोषाच्या घोषणांनी परिसर दुमदुमन सोडला होता. त्याचवेळी दुसऱ्या बाजू कडून काळे झेंड्याची निशाणी दाखवून निषेध व्यक्त करत मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या.