राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास’ : श्री. बाबासाहेब नदाफ
देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथे 'राष्ट्रीय सेवा योजना दिन' साजरा
निपाणी नगरी प्रतिनिधी (25) अर्जुननगर
देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने ‘आजचा युवक आणि सामाजिक बांधिलकी’ या विषयावर श्री. बाबासाहेब नदाफ, सह मंत्री, राष्ट्र सेवा दल यांचे व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रोफे. डॉ. जी. डी. इंगळे, प्राचार्या देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर यांनी भूषविले. प्रमुख मान्यवर उप प्राचार्या सौ. एस. पी. जाधव, पर्यवेक्षक डॉ. ए. एस. डोनर आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने करण्यात आली. आजच्या गतिमान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसांमधील संवाद हरवत असल्याची खंत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी जागरुक बनण्याची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास होण्यासाठी, श्रम संस्कृतीचे महत्त्व, स्वच्छता, राष्ट्रभक्ती, सामाजिक बांधिलकी इत्यादी मूल्ये रुजविण्यासाठी प्रयत्न केले जातात. व्यक्तिमत्त्व विकास, पर्यावरण संरक्षण व संवर्धन आणि नेतृत्व गुणांचा विकास साधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाचे काम करते. अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याची महती आपण जपली पाहिजे. ‘देश माझा मी देशाचा’ ही भावना वाढीस लागली पाहीजे. आपली संस्कृती जपण्यासाठी प्रयत्न जाणिवपूर्वक केला पाहीजे. स्वच्छतेची सुरुवात स्वतः केली तर इतरांनाही त्यांतून प्रेरणा मिळते व आपले जीवन चांगले बनते. राष्ट्राच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्व भारतीय नागरिकांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय नागरीकांना बहुमोल ठेवा दिला आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थी सामाजिक बांधिलकी जपणारा, राष्ट्रभक्ती, श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता अशा मूल्यांची जपणूक करत घडतो, असे मत प्रमुख पाहुणे मा.श्री बाबासाहेब नदाफ यांनी व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये देवचंद महा विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांनी, राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थी जीवनामध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वच्छता, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी ही मूल्ये आत्मसात केल्याने भावी काळात भारताचा आदर्श नागरिक घडू शकतो, आपले घर, परिसर, महाविद्यालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, अशी शिकवण अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्राप्त होते. विद्यार्थ्यांच्या नेतृत्व गुणांचा विकास करणारे उपक्रम, विविध स्पर्धा, प्रबोधनपर फेरी, शिबीरे या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यात मदत होते. असे मत व्यक्त केले. याप्रसंगी नवागत स्वयंसेवकांचे स्वागत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यांत आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. पी. पाटील, रासेयो कार्यक्रम अधिकारी, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.टी.ए.पाटील, आभार प्रा. ए. ए. कुराडे आणि सूत्रसंचालन प्रा. आर.एस. सोकासने यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेतील आपला अनुभव कु. प्रिया हजारे या विद्यार्थीनीने व्यक्त केला. याप्रसंगी उपप्राचार्या प्रा.सौ.एस.पी. जाधव, पर्यवेक्षक प्रा. डॉ. ए.एस. डोणर, डॉ. प्रविणसिंह शिलेदार, डॉ.ए.एस. कांबळे,प्रा.प्रसाद छापखाने,प्रा.डॉ.पी.एस.चिकोडे,प्रा.सौ.ए.ए.साळुंखे,प्रा.एन.एम.मधाळे, श्री.अमोल घोडके आदी वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना समिती सदस्य प्राध्यापक व स्वयंसेवक होते.