देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथे पालक मेळावा संपन्न!
पालक मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला जलार्पण करून झाली!
निपाणी नगरी प्रतिनिधी अर्जुननगर (01ऑक्टो 2024)
देवचंद महाविद्यालय अर्जुननगर येथील कनिष्ठ विभागाचा शैक्षणिक वर्ष 2024 -25 मधील ‘विद्यार्थी-शिक्षक- पालक मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. कला ,वाणिज्य व विज्ञान विभागातील शिकत असणाऱ्या पाल्यांच्या पालकांना आमंत्रित करण्यात आले होते.पालक मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला जलार्पण करून झाली. स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.सौ.एस.पी. जाधव यांनी केले. त्यामध्ये त्यांनी पालक मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. प्रा सदानंद झळके यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रम आणि विद्यार्थ्यांनी संपादन केलेले यश दर्शवणारी पी.पी.टी. पालकांच्या समोर सादर केली. पर्यवेक्षक प्रा. डॉ.अशोक डोनर यांनी पालकांना आवाहन केले की विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असल्यास अभ्यासा व्यतिरिक्त त्यांनी आपला वेळ मैदानावर किंवा ग्रंथालयात घालवला पाहिजे. सध्याची तरुण पिढी ही मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होण्यात अडथळा निर्माण होत आहे. म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर गरजेपुरता करावा. याबद्दल मार्गदर्शन केले. बहुतांश पालकांनी विविध प्रश्न विचारून युनिफॉर्म लागू करण्याची मागणी केली. त्यांच्या शंका आणि त्यांची मते जाणून घेऊन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रो. डॉ. जी. डी. इंगळे म्हणाल्या की देवचंद महाविद्यालय अर्जुननगर हे सीमा भागातील एक नामांकित महाविद्यालय असून येथे प्रवेश घेतलेला विद्यार्थी हा निश्चितच भावी आयुष्यामध्ये उज्वल यश संपादन करू शकतो आणि उच्च पदापर्यंत जाऊ शकतो. त्यासाठी महाविद्यालयात असणाऱ्या विविध विभागाच्या सुविधांचा आणि उपक्रमांचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमात जर विद्यार्थी सहभागी झाले तर निश्चितच कोणत्या ना कोणत्यातरी कौशल्या मध्ये तो प्राविण्य संपादन करेल आणि आपल्या कुटुंबाचे आणि महाविद्यालयाचे नाव उज्वल करेल. त्या पुढे म्हणाल्या की देवचंद कॉलेजमध्ये शिकत असणारा विद्यार्थी हा गुणवत्ताधारक असून तो भावी आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी पडू शकणार नाही .पालकांनी दाखवलेला विश्वास हा मी निश्चित सार्थ करून दाखवू आणि पालक विद्यार्थी व शिक्षक या तिघांमध्ये ही सुसंवाद असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशा साळुंखे व प्रा. जयशीला करडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार पालक मेळाव्याचे निमंत्रक प्रा. प्रकाश पाटील यांनी मानले. या पालक मेळाव्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आशिषभाई शाह, उपाध्यक्षा डॉ. सौ. तृप्तीभाभी शाह व खजिनदार सुबोधभाई शाह यांची प्रेरणा मिळाली.या मेळाव्यास ग्रामीण भागातून व निपाणी परिसरातून मोठ्या प्रमाणात पालक व विद्यार्थी उपस्थित होते.हा पालक मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रा सागर माने, प्रा.महेश हगलदिवटे , प्रा.शिवाजी कुंभार , प्रा. राणी सोकासने यांनी सहकार्य केले तर सिद्धू बेडर यांचे तांत्रिक साह्य लाभले.